दुष्काळात को‘रड’; सातारा जिल्ह्यात प्रमुख धरणांमध्ये ६९ टीएमसीच साठा शिल्लक!
By नितीन काळेल | Updated: April 2, 2024 18:18 IST2024-04-02T18:13:01+5:302024-04-02T18:18:02+5:30
सिंचन मागणी कायम

दुष्काळात को‘रड’; सातारा जिल्ह्यात प्रमुख धरणांमध्ये ६९ टीएमसीच साठा शिल्लक!
सातारा : जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठलाय. उरमोडी धरणात तर २० टक्केच पाणीसाठा राहिला आहे. तर कोयना धरणात ५३ टीएमसी पाणी शिल्लक असल्याने समाधानाची स्थिती आहे. दरम्यान, सध्या प्रमुख सहा धरणांत ६९ टीएमसी साठा असून, तो गतवर्षीपेक्षा कमीच आहे.
जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी, अशी प्रमुख धरणे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पर्जन्यमान अधिक होते. त्याच भागात ही धरणे असल्याने दरवर्षी ओसंडून वाहतात; पण गेल्यावर्षी संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस कमी झालेला. त्यामुळे बहुतांशी धरणे भरली नाहीत. पाऊस कमी झाल्याने गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.
कोयना धरणाच्या पाण्यावर सांगली जिल्ह्याचा वाटा अधिक आहे. त्यामुळे सांगलीसाठी मागणीनुसार सिंचनाकरिता पाणी विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू आहे. त्यातच दुष्काळी स्थिती असल्याने आगामी काळातही पाण्याला मोठी मागणी राहणार आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत पाण्याचा वापरही वाढणार आहे.
जिल्ह्यातील धरण पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
धरण - एकूण क्षमता - यंदाचा साठा
धोम - १३.५० - ६.३७
कण्हेर - १०.१० - ३.४८
कोयना - १०५.२५ - ५२.९६
बलकवडी - ४.०८ - १.२४
उरमोडी - ९.९६ - १.९९
तारळी - ५.८५ - ३.३३