खंडाळ्यात राजकारणाने फोडले पक्षीय बांध

By admin | Published: March 1, 2017 11:50 PM2017-03-01T23:50:58+5:302017-03-01T23:50:58+5:30

समिकरणे बदलली : राजकीय तत्व चव्हाट्यावर; पक्षीय धोरण खुटीला टांगून जिरवाजिरवीचे राजकारण

Political parties blamed by Khandwa politics | खंडाळ्यात राजकारणाने फोडले पक्षीय बांध

खंडाळ्यात राजकारणाने फोडले पक्षीय बांध

Next



खंडाळा : खंडाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान सर्वच पक्षांची मोडतोड झाली आहे. पक्षीय धोरण खुंटीला टांगून व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेपोटी आणि जिरवा जिरवीच्या राजकारणाची खुमखुमी उफाळून आल्यामुळे कोणाचंही वासरू कोणत्याही रानात मोकाटं चरत होतं. आता यात काहींनी बाळसं धरलं तर काहींनी मोकळ्याच उड्या घेतल्यानं अंगावरचं मासही गमावलं. त्यामुळे तालुक्याच्या पक्षीय राजकारणाची दिशाच भरकटली आहे. त्यामुळे राजकीय तत्वे चव्हाट्यावर टांगल्या गेलेल्या खंडाळ्यात भरकटलेल्या राजकारणाला नवी दिशा मिळणार का?, असाच प्रश्न सर्वसामान्य खंडाळकरांना पडला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. खंडाळा तालुक्यात या निवडणुकीत भलतीच समीकरणं उदयास आली. यामध्ये राजकीय पक्षही चांगलेच भरडले गेले. त्यातून तावून सुलाखून कशातरी निवडणुकीचा सामना केला गेला. पण आता निवडणुकीनंतर पुढे काय?, असा यक्ष प्रश्न पक्षांसमोर तसेच कार्यकर्त्यांसमोर ‘आ’वासून उभा आहे.
या निवडणुकीत खंडाळा तालुक्यात सर्वाधिक बलाढ्य असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच बंडाळीचा आगडोंब उसळला होता. तीनही जिल्हा परिषद गटात त्या आगीचे भडके उडाले होते. त्याचीच लागण शिवसेनेलाही काही ठिकाणी झाली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या घराचे तुकडे झाले. इच्छुक उमेदवारांनी आपापले भाग वाटून घेतले. तोच त्यांना स्वत:चा बालेकिल्ला वाटू लागला. त्यामुळे टोकाचा संघर्ष उभा करून निवडणुकीच्या मैदानात आपापली फौज उतरवली गेली.
राष्ट्रवादीच्या अनेक सेनापतींनी सवतासुभा मांडल्याने आमदार मकरंद पाटील यांचीही काहीकाळ मती गुंग झालेली. पण पराक्रमाच्या जोरावर साम्राज्य उभं करणाराच खरा राजा असतो. याची जाणीव झाल्याने आमदारांनी ‘मिशन खंडाळा मोहीम’ सुरू केली.
रात्रीचा दिवस करून सैन्यांची जुळवाजुळव केली. साथ सोडून गेलेल्या सेनापतींचे काही शिलेदार हाताला घेतले. तर राजकारणात कोणीच कायमचा वैरी नसतो. हे ध्यानीमनी धरून विरोधकांनाही ऐनवेळी दिमतीला घेऊन खंडाळ्याच्या गडाचे तीनही बुरुज ताकदीने लढवले. आणि यात अपेक्षीय यशही मिळाले; पण या निवडणुकीत राष्ट्रवादीचा तंबू चांगलाच फाटला होता. ऐन निवडणुकीत नवनवीन धागे जोडून वादळ अडविण्यापुरतं काम झालं. मात्र, आता तोच तंबू पुन्हा ताकदीने, भक्कम बनविण्यासाठी आता कोणकोणते धागे वापरणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडक आणि मजबूत व पक्षनिष्ठ धागे वापरले तरच तोफांचे आवाज ‘मकरंद’मय येतील, ही वस्तुस्थिती आहे.
वास्तविक, गेल्या काही महिन्यांत शिवसेनेने तालुक्यात चांगली उभारी घेतली होती. इतर पक्षांतील आवक झाल्याने सेनेची अचूक तीरंदाजी होईल, असे वाटत होते. मात्र, आश्वासक ठिकाणीच फुटीचं ग्रहण लागलं. काही मावळ्यांच्या हाती धनुष्य लागला तर काहींच्या हाती बाण! त्यामुळे लढायचं कसं, असा प्रश्न मैदानात उतारल्यावर लक्षात आला. मात्र, सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी एकही स्थानिक सदस्य दिमतीला नसताना दिलेली लढत आणि मिळवलेली मते चांगल्या कामगिरीचे द्योतक ठरले. हीच काय ती जमेची बाजू.
अन्यथा पालकमंत्री आणि उपनेत्यांच्या गेल्या महिन्यात धडाडलेल्या तोफांचे बार मात्र फुसकेच निघाले. असे असले तरी भविष्यात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवसेनाच बळ बांधू शकते, ही शक्यताही नाकारता येत नाही.
खंडाळ्याच्या माळरानावर निवडणुकीपूर्वी कमळ फुलवायला निघालेल्या मातब्बरांनी ऐनवेळी अपक्ष आघाडी केल्याने कमळ फुलवण्याआधीच कोमेजले. काही ठिकाणी रोपटे लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो निरर्थकच ठरला. (प्रतिनिधी)
पूर्वपदावर येण्यासाठी काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्वाची गरज
४एकीकडे राष्ट्रवादीची झालेली फाटाफूट विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची ही चांगली वेळ होती. मात्र, राष्ट्रवादीचा पारंपरिक लढतीदार काँग्रेस पुरती झोपली होती. मैदानात सरळ सामना करण्याऐवजी अनेक ठिकाणी त्यांनी तलवारी म्यान केल्या. आपल्यावर नामुष्की नको म्हणून दुसऱ्याच्या छावणीचा आसराही घेतला. जिथे काही निवडक लढले त्यांचीही त्रेधातिरपीट उडाली. पक्षाची हक्काची मते उमेदवारांच्या पारड्यात पडली नाहीत. वास्तविक, खंडाळा नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर काँग्रेसला आश्वासक नेतृत्वच उभं करता आलं नाही. त्यामुळे उमेदवारांच्यातही मेळ राहिला नाही. पंचायत समितीच्या उमेदवारांना मिळालेली मतंही जिल्हा परिषदेला मिळू शकली नाहीत. काँग्रेसच्या सैन्याची दैना झाल्यानं काहींनी राष्ट्रवादीला मदत केली तर काहींनी अपक्षाला साथ दिली. त्यामुळे काँग्रेसची पुरती वाताहत झाल्याचे दिसून आले. पक्षाला आता पूर्वपदावर येण्यासाठी खंबीर नेतृत्वाची आवश्यकता आहे.

Web Title: Political parties blamed by Khandwa politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.