तुटक्या संरक्षक भिंतीला नायलॉन दोरीचे संरक्षण
By admin | Published: October 10, 2016 11:54 PM2016-10-10T23:54:48+5:302016-10-10T23:54:48+5:30
पाहावं ते नवलच : कोटेश्वर पुलावरील प्रवास ठरतोय धोकादायक
सातारा : साताऱ्यातील कोटेश्वर पुलावरील संरक्षक कठडा पालिकेच्या वतीने तोडण्यात आला असून, या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. या कठड्याजवळ बॅरिकेट्स उभारण्याऐवजी चक्क नायलॉनची दोरी बांधून संरक्षण देण्यात आल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोटेश्वर पुलाशेजारी असणारा संरक्षण भिंतीचा कठडा काही दिवसांपूर्र्वी सातारा नगरपालिकेने ओढ्याची स्वच्छता करण्यासाठी जेसीबीद्वारे तोडला गेला़
हा तोडलेला कठडा गेले अनेक दिवसांपासून त्याच अवस्थेत असल्याने नागरिक तसेच वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे़ विशेषत: शाहूपुरीकडून उताराने भरधावपणे येणाऱ्या वाहनांना यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.
लहान मुले, वृद्ध नागरिकांची या पुलावरून सतत ये-जा सुरू असते़ रात्रीच्या वेळी या परिसरात अनेक ठिकाणी असणारे दिवे बंद असतात़ यामुळे हा धोका अधिक जाणवत आहे़ नागरिकाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत सातारा नगरपालिकेने उदासीनतेची भावना दूर ठेवून नागरिकांच्या सुरक्षितेला प्राधान्यक्रम दिले पाहिजे. या समस्येबाबत तातडीने कार्यवाही झाली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
स्वार्थापोटी पुलाचे काम रेंगाळले
कोटेश्वर पुलाच्या रुंदीकरण व संरक्षण भिंतीबाबत या परिसरातील नागरिकांनी अनेकदा लेखी निवेदन व तक्रारी पालिकेकडे केल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते़ राजकीय हेवेदावे व स्वार्थापोटी या पुलाचे काम रेंगाळले आहे़ नागरिकांच्या सुरक्षितेबाबत संबंधित विभागाने प्राधान्यक्रम द्यावा, ऐवढीच अपेक्षा नागरिकांची आहे़ दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना होणे अत्यंत गरजेचे आहे.
- श्रीरंग काटेकर, सामाजिक कार्यकर्ता