पीक विम्यासाठी उरले तीन दिवस; सातारा जिल्ह्यात दोन लाख शेतकरी सहभागी

By नितीन काळेल | Published: July 13, 2024 07:36 PM2024-07-13T19:36:30+5:302024-07-13T19:36:37+5:30

एक रुपयात विमा : बाजरी १८ हजार तर कांद्याला ४६ हजार भरपाई 

Three days left for crop insurance; Two lakh farmers participated in Satara district | पीक विम्यासाठी उरले तीन दिवस; सातारा जिल्ह्यात दोन लाख शेतकरी सहभागी

पीक विम्यासाठी उरले तीन दिवस; सातारा जिल्ह्यात दोन लाख शेतकरी सहभागी

सातारा : शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी पीक विमा योजना असून एक रुपया भरून सहभाग घेता येत आहे. यावर्षीही खरीप हंगामातील विमा उतरविण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा उतरवलाय. अजूनही दोन दिवस शिल्लक असल्याने आकडा वाढणार आहे. तर विम्याअंतर्गत नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना बाजरीसाठी १८ तर कांद्याला हेक्टरी ४६ हजारांपर्यंत मदत मिळू शकते.

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे पीक उत्पादनालाही फटका बसतो. यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासनाचाही वाटा असायचा; पण राज्य शासनाने गेल्यावर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीही एक रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरू आहे. या योजनेत बिगर कर्जदार शेतकरीही सहभागी होऊ शकतात.

 जिल्ह्यात गेल्यावर्षी या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे पावणे तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा काढला होता. यामध्ये माण तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी सहभागी झाले होते. त्यातच गेल्यावर्षी दुष्काळ पडल्याने लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील नुकसानीचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे यंदाही शेतकरी विमा उतरवू लागले आहेत. यासाठी १५ जुलै अंतिम मुदत आहे. तर शनिवारी सकाळपर्यंत दोन लाखांहून अधिक शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते. उर्वरित दोन दिवसांत सहभागी शेतकऱ्यांचा आकडा तीन लाखांकडे जाण्याचा अंदाज आहे.

भाताला ४१, सोयाबीन ३२ हजार संरक्षित रक्कम...

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळणार आहे. तर त्यासाठी नुकसान झाल्यास हेक्टरी मदत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये भाताला ४१ हजार रुपये, ज्वारी, २० हजार, बाजरी १८ हजार, नाचणी २० हजार, भुईमूग ४० हजार, सोयाबीन ३२ हजार, मूग २५ हजार ८१७, उडीद २६ हजार, कांद्यासाठी ४६ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे.

Web Title: Three days left for crop insurance; Two lakh farmers participated in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.