गणेशोत्सवासाठी कोकणात २२११ बसेस

By admin | Published: August 7, 2016 10:43 PM2016-08-07T22:43:11+5:302016-08-07T22:43:11+5:30

नियोजन सुरु : तीन जिल्ह्यात जादा गाड्यांची सोय

2211 buses in Konkan for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात २२११ बसेस

गणेशोत्सवासाठी कोकणात २२११ बसेस

Next

मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरी
भक्तांना वेध लागलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघा महिना शिल्लक राहिला आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे कोकणात २२११ जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू झाले आहे.
गतवर्षी रत्नागिरी विभागात गणेशोत्सव कालावधीत १४१७, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३८२, तर रायगड जिल्ह्यात २११ जादा गाड्या मुंबईहून भक्त मंडळींना घेऊन आल्या होत्या. गतवर्षी एकूण २०१३ जादा गाड्या सुटल्या होत्या. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यावर्षी गाड्यांच्या संख्येत वाढ केली असून, २२११ जादा गाड्यांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी दरवर्षी जादा गाड्यांची सुविधा करण्यात येते. ५ ते १० सप्टेंबरअखेर गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. मुंबईत काम करणारी कोकणातील बहुतांश मंडळी गणेशोत्सवासाठी गावी परतते. ग्रामीण भागाची ‘जीवन वाहिनी’ ठरलेली एस. टी. वाडीवस्तीवर पोहोचली आहे. रेल्वे ग्रामीण भागातील सर्वांनाच शक्य नसल्यामुळे एस. टी.चा प्रवास सोयीस्कर ठरत आहे. गणेशोत्सवासाठी एस. टी.च्या जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एखाद्या गावातील मंडळींनी ४४ सीटचे आरक्षण केल्यास त्यांना त्यांच्या गावासाठी खास बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असली तरी एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. ऐन गणेशोत्सवात रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेले असताना एस. टी.ने मात्र सुरळीत, सुरक्षित प्रवासी वाहतूक सुरू असते.
सन २०१३मध्ये रत्नागिरी विभागाने १३१७ जादा गाड्या सोडल्या होत्या. त्याद्वारे १ कोटी ८७ लाख ३८ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न लाभले होते. २०१४मध्ये १४३० जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे दोन कोटी १० लाख ६९ हजारांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षी १४१७ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे एक कोटी ७१ लाख ३२ हजारांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षी मागील दोन वर्षांच्या तुलनेत उत्पन्नात चांगलीच घट झाली होती. तरीही यावर्षी महामंडळाने गणपती सणासाठी गाड्यांचे नियोजन केले आहे. गौरी - गणपती विसर्जनानंतर मुंबईकरांच्या परतीसाठी रत्नागिरी विभागातून १० सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. याशिवाय नियमित १५० गाड्या दररोज मुंबई मार्गावर धावणार आहेत.
गणेशोत्सव कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता जादा गाड्यांसमवेत चेकपोस्ट गस्तीपथके तैनात करण्यात येणार आहेत. सकाळी १० ते १२.३० तसेच १२.३० ते ६ यावेळेत गस्तीपथके महामार्गावर कार्यरत राहून जादा गाड्यांची तपासणी करणार आहेत. कशेडी येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे. याशिवाय तात्पुरते वाहनतळ व दुरुस्ती पथकांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येक आगारामध्ये चौकशी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणात येणाऱ्या मुंबईकरांची चांगली सोय होणार आहे.

Web Title: 2211 buses in Konkan for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.