आगामी निवडणुकांसाठी भाजपची व्यूहरचना

By admin | Published: July 21, 2016 11:16 PM2016-07-21T23:16:53+5:302016-07-21T23:30:05+5:30

प्रमोद जठार यांची माहिती : पक्षवाढीसाठी अटल बंधनाचा संकल्प

BJP's strategy for upcoming elections | आगामी निवडणुकांसाठी भाजपची व्यूहरचना

आगामी निवडणुकांसाठी भाजपची व्यूहरचना

Next

कणकवली : सिंधुदुर्गात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या निवडणूक समितीची स्थापना करण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त भाजपाचे सदस्य निवडून यावेत यासाठी व्यूहरचना निश्चित करण्यात आली आहे तर १८ आॅगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भाजप परिवार वाढविण्याच्या दृष्टीने ‘अटल बंधन’ बांधण्यात येणार आहे. या माध्यमातून ३ लाख लोकांना परिवारात समाविष्ट करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे दिली.येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भाजपाच्या निवडणूक समितीची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रमोद जठार यांनी बैठकीतील मुद्यांबाबत माहिती दिली. यावेळी तालुकाध्यक्ष रविंद्र शेट्ये, परशुराम झगडे, सुहास सावंत आदी उपस्थित होते.
प्रमोद जठार म्हणाले, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीने १७ सदस्यांचा समावेश असलेली निवडणूक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी मी असणार आहे. तर माजी आमदार राजन तेली, अतुल काळसेकर, विलास हडकर, अ‍ॅड. अजित गोगटे, स्नेहा कुबल, जयदेव कदम, प्रमोद रावराणे, प्रभाकर सावंत, यशवंत आठलेकर, राजन चिके, शामराव काणेकर, सदाशिव ओगले, राजश्री धुमाळे आदींचा समावेश आहे. या समितीची पहिली बैठक गुरुवारी झाली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रभारी म्हणून काका कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी संकलित केलेल्या अहवालावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकीबाबतही व्यूहरचना आखण्यात आली आहे.
मालवण येथे ५ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तर देवगड येथे सायंकाळी ५ वाजता, ६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले येथे बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून देवगडसाठी अ‍ॅड. अजित गोगटे, मालवणसाठी विलास हडकर, वेंगुर्लेसाठी स्नेहा कुबल तर सावंतवाडीसाठी राजन तेली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील कालावधीत निवडणुकीच्या निमित्ताने मेळावे तसेच कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद गटस्तरावर एका कार्यकर्त्याला पालकत्व देऊन त्या सर्वांची दर आठवड्याला बैठक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंत्र्यांचे दौरे निश्चित करून विविध समस्या मार्गी लावण्यात येणार असल्याचेही जठार यांनी सांगितले.
भाजपाच्यावतीने ‘अटल बंधन’
रक्षाबंधनापासून भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक तसेच इतर पक्षातून भाजपात येणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटीत करण्यासाठी ‘अटल बंधन’ बांधण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९१३ बुथच्या माध्यमातून हे बंधन बांधण्यात येणार असून ३ लाख लोकांना भाजपा परिवाराशी जोडण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे जठार यांनी सांगितले.
युतीचा निर्णय निवडणुकीवेळी
पक्षाचे काम वेगळे असून निवडणूक हा वेगळा विषय आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर युती करायची की नाही हा निर्णय त्या त्या वेळी निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात येईल. अगोदरच युती जाहिर केल्यास कार्यकर्ते शांत रहात असल्याने पक्षाचे नुकसान होत असते. त्यामुळे पक्ष वाढविण्यासाठी इतरवेळी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जठार यावेळी म्हणाले. (वार्ताहर)+

राणेंना गंभीर घेऊ नका
नारायण राणे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या जुगलबंदीत जिल्हावासियांनी एकच संदेश घ्यायचा आहे. तो म्हणजे राजकारणात नारायण राणेंना गंभीरपणे घेऊ नये. सोनिया गांधी, माणिकराव ठाकरे यांच्यावर टीका करणारे नारायण राणे आता काँग्रेसचेच विधान परिषद सदस्य झाले आहेत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य काँग्रेसही गंभीरपणे घेत नाही. तसेच आपणही केले पाहिजे, असे जठार म्हणाले.

Web Title: BJP's strategy for upcoming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.