जिल्हाप्रमुखांसह २५जणांविरूद्ध गुन्हा

By admin | Published: October 26, 2015 11:35 PM2015-10-26T23:35:16+5:302015-10-27T00:13:22+5:30

देवरुख नगरपंचायत : नगराध्यक्ष निवडणुकीत अपहरण नाट्य, जिल्हाप्रमुखांसह २५जणांवर गुन्हा

Crime against 25 people including district chief | जिल्हाप्रमुखांसह २५जणांविरूद्ध गुन्हा

जिल्हाप्रमुखांसह २५जणांविरूद्ध गुन्हा

Next

रत्नागिरी / देवरुख : देवरूख नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अज्ञातवासात गेलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अपहरण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह ३ नगरसेवक व अन्य वीसजणांवर पूर्णगड सागरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी नगरसेवक मंगेश शिंदे, माजी उपनगराध्यक्ष मनीष सावंत यांना अटक करण्यात आली आहे.देवरुख नगरपंचायतीच्या अडीच वर्षांचा कालावधी संपत आल्याने २६ आॅक्टोबर रोजी नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली होती. ही निवडणूक अपेक्षेप्रमाणेच रंगतदार होत होती. भाजपने शिवसेनेशी काडीमोड घेत राष्ट्रवादीशी संगनमत करीत नगरपंचायतीची सत्ता काबीज करण्याचा निश्चय केला होता. मात्र, अडीच वर्षे सुखाने संसार केलेल्या शिवसेनेला यावेळी सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर जोरदारपणे मोर्चेबांधणी करण्यात आली होती. याबाबत सेनेमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण होते.देवरूख नगराध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाल्यापासूनच वातावरण तापले होते. आरोप-प्रत्यारोप न होता अंतर्गत राजकारणच जास्त शिजत असल्याने या राजकारणाची देवरूखपलिकडे विशेष चर्चा होत नव्हती. मात्र, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर हळूहळू राजकारण तापू लागले आणि त्यातून कल्पनाशक्तीपलिकडचे नाट्य रंगले.
राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजप यांचे मिळून १० असे गटबंधन होत असल्याने शिवसेनेच्या पराजयाची चिन्ह दिसू लागली होती आणि यावेळी शिवसेनेकडून नगरसेवकांना फूस लावून मतदान करण्यास फोडाफोडीचे वातावरण प्रयत्न झाले असते. यातील काणतीही खेळी अयशस्वी होऊ नये, याची खबरदारी म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि भाजप मिळून ९ उमेदवार अज्ञातवासात गेले होते. हे नऊ उमेदवार अज्ञातवासात असल्याच्या चर्चाही देवरुखमध्ये शुक्रवारपासून शहरात सुरु होती.
आता राष्ट्रवादी व भाजप यांची संख्या १० इतकी झाल्याने सत्ता भाजपची येणार यातच सेनेला आपला पराभव दिसू लागला होता. म्हणूनच सेनेकडून अपहरणासारखे प्रयत्न सोमवारी पहाटे करण्यात आले, असा आरोप सोमवारी भाजपकडून करण्यात आला. शिवसेनेच्या मंडळींची याबाबत शोधाशोध सुरू झाली. याचा सुगावा लागल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण केलेल्यांना पूर्णगड येथे लपवून ठेवले होते. याबाबत पूर्णगड पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.
पूर्णगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवरुखातील राष्ट्रवादीचे ४, भाजपचे ५ असे ९ नगरसेवक पूर्णगड येथील सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्र याठिकाणी होते. सोमवारी पहाटे ३.५०च्या दरम्यान, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, नगरसेवक मंगेश शिंदे, मनीष सावंत, नंदादीप बोरूकर, छोट्या गवाणकर आणि अन्य २० लोकांवर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ५ जण व अन्य २० लोकांना ४ गाड्या नेवून पूर्णगड सिद्धेश्वर कृ षी पर्यटन केंद्रात ज्याठिकाणी ९ नगरसेवक राहात होते, तेथे आणण्यात आले. तेथील खोलीच्या दरवाजावर धक्के मारुन हे सारे आतमध्ये घुसले. मात्र, काही वेळाने नगराध्यक्षपदाचे उमेदवार नीलेश भुरवणे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल भुवड आणि भाजपचे कुंदन कुलकर्णी या तिघांना बाहेर काढण्यात आल्याची तक्रार त्या पर्यटन केंद्राचे मालक संजय सुरेश पाथरे यांनी पूर्णगड सागरी पोलीस स्थानकात दिली आहे. पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत अपहरणकर्त्यांनी ४ गाड्यांचा वापर केला होता, असे म्हटले आहे.सकृतदर्शनीयात १ क्वॉलिस, १ अल्टो, २ इनोव्हा अशा चार गाड्या होत्या. त्यातील एक गाडी राजापूरच्या दिशेने आणि तीन गाड्या पावसच्या दिशेने गेल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.या तक्रारीवरून देवरूख नगरसेवक मनीष सावंत, मंगेश शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. अपहरणाच्यावेळी या शिवसैनिकांनी अपहरणकर्त्यांना दुपारी सोडून देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, दोघांना भुवड व भुरवणे यांना आडिवरेच्या अलिकडच्या रस्त्यावर दुपारी २ च्या सुमारास सोडून देण्यात आले. त्यांची तोंडे बांधलेली होती. रस्ता कळत नसल्याने ते रिक्षाने पूर्णगड येथे गेले. तेथे पोलिसांना हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांची मेडिकल पूर्णगड येथे सायंकाळी करण्यात आली.दरम्यान, या प्रकरणाची चर्चा देवरूखसह रत्नागिरी परिसरातही सुरू होती. रात्री उशिरापर्यंत देवरूख परिसरातील पोलीस बंदोबस्त तसाच तैनात होता. (प्रतिनिधी)


अपहरणाचा प्रकार : हालचाली नको त्या वळणावर गेल्या...
देवरूख नगरपंचायतीमध्ये गेले अनेक दिवस नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु होती. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला होता. नगरपंचायतीचे मुख्य पद कोणाकडे जाणार? याबाबत विविध चर्चा सुरु होत्या. अखेरीस या हालचाली नको त्या वळणावर गेल्याची चर्चा सुरु आहे. नगराध्यक्ष निवडीसाठी काही सदस्यांना अज्ञातवासात नेल्याची सुरुवातीला चर्चा होती. मात्र, त्यानंतर या चर्चेला सोमवारी नाट्यमय कलाटणी मिळाली. अंतर्गत राजकारणामुळे ही निवडणूक गाजणार, याची सुरक्षा यंत्रणेला याअगोदरच चाहुल लागली असल्याने परिसरात रविवारपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


पोलीस बंदोबस्त
दरम्यान, देवरूखमध्ये शीघ्र कृ ती दलाच्या जवानांबरोबरच अतिरिक्त पोलीस दल तैनात होते. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील देवरुख येथे होते. पूर्णगड येथील घटनेचा अधिक तपास एपीआय प्रल्हाद पाटील करीत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून दखल
नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवाराचे अपहरण झाले असल्याची माहिती रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आणि त्यांनी त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला. त्यामुळे या प्रकरणाची सूत्रे तत्काळ हलली. त्यामुळेच पोलिसांनी पुढील हालचाली वेगाने केल्या आणि अपहृत भुरवणे यांची सुटका झाली.


भाजपनेच संसार मोडला
शिवसेनेच्या आमदारांचा आरोप
देवरुख : देवरुख नगरपंचायतीमध्ये असलेली युती तोडून भाजपने अचानक राष्ट्रवादीशी सलगी केली व नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. त्यामुळे भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला असून, युतीला कौल दिलेल्या मतदारांचासुद्धा विश्वासघात केला असल्याची प्रतिक्रिया आमदार सदानंद चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
चव्हाण म्हणाले की, भाजपच्या दोन नगरसेवकांचे शिवसेनेने अपहरण केल्याचे अजून निष्पन्न झालेले नाही. उलट जाणूनबुजून आमच्या दोन नगरसेवकांना अटक करण्यात आली असून, त्यांना नगरपंचायत निवडणुकीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. भाजपने सत्तेत असल्यामुळे गृहमंत्रीपदाचा दुरुपयोग करुन शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले व या अपहरण प्रकरणात त्यांना नाहक गोवण्यात आले असल्याचा आरोपही आमदार चव्हाण यांनी केला.
शिवसेनेने दिलेला उमेदवार योग्य नव्हता, या आरोपाला उत्तर देताना आमदार चव्हाण म्हणाले की, असे त्यांचे म्हणणे होते मग भाजपने आमच्याशी चर्चा का केली नाही. आम्ही बैठकीला या, असे वारंवार सांगूनसुद्धा भाजपने आमचे ऐकले नाही व शेवटी आमची असलेली युती तोडून टाकत आयत्यावेळी राष्ट्रवादीशी जवळीक साधली, असे चव्हाण म्हणाले.
त्यांनी सांगितले की, केंद्रात, राज्यात, स्थानिक पातळीवर भाजपचे शिवसेनेशी असलेले संबंध दुरावले आहेत. हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्य तो निर्णय घेतील. स्थानिक पातळीवर वातावरण बिघडवायचे काम भाजप करीत आहे.
पोलीस व प्रशासनाची मदत घेऊन भाजपने ही निवडणूक लढवली आहे. ही निवडणूक रद्द होण्यासाठी आम्ही सर्वजण वरिष्ठ पातळीवर दाद मागणार असल्याचेही आमदार साळवी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)


मतदारांची फसवणूक
आमदार राजन साळवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी भाजप - शिवसेनेने एकत्र येऊन युती केली व युती करुन लोकांकडे मते मागितली होती. मात्र, भाजपने आता काहीतरी कुरबुरी काढून ही युती तोडली आहे. लांजा, रत्नागिरी व मंडणगडमध्येही भाजपने असेच केले आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Crime against 25 people including district chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.