भटक्या कुत्र्यांनी तोडले बालकाचे लचके
By Admin | Published: August 28, 2016 12:27 AM2016-08-28T00:27:15+5:302016-08-28T00:27:15+5:30
प्रश्न ऐरणीवर : कुडाळातील घटनेने परिसरात भीती
कुडाळ : कुडाळ-गोधडवाडी येथील रमजान जाफर मिड्डीगेरी (वय ५) याच्यावर भटक्या कुत्र्यांच्या समूहाने हल्ला करून गंभीर जखमी केले. मानेजवळ तसेच शरीराच्या अनेक भागांचा चावा घेतल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रमजान मिड्डीगेरी शनिवारी सकाळी आपल्या घराजवळ असणाऱ्या रस्त्याच्या कडेला खेळत होता. यावेळी त्याच्यावर अचानक आठ ते दहा भटक्या कुत्र्यांनी जोरदार हल्ला करत त्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. कुत्र्यांच्या अचानक हल्ल्याने रमजान जिवाच्या आकांताने ओरडू लागला. त्याच्या आवाजाने घरातील नातेवाइकांसह शेजारी आले. त्यांनी कुत्र्यांना हुसकावताच त्यांच्यावरही कुत्री हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागली; पण कुत्र्यांच्या समूहात अडकलेल्या रमजानची केविलवाणी अवस्था पाहून कुणी काठी तर कुणी दगड मारून रमजानची सुटका करून घेतली.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या रमजानचा चारही बाजूंनी चावा घेतला असून, मानेच्या जवळ मोठा लचका तोडला होता. तर तोंडाला, हाताला आणि कानाजवळही त्याला मोठ्या जखमा झाल्याने त्याच्या अंगावरून रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्याच अवस्थेत त्याला कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.
तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर तत्काळ उपचार केले. यावेळी त्याच्या शरीरावर जखमा खोल स्वरूपाच्या असल्याने बऱ्याच ठिकाणी टाके घालावे लागले.
दरम्यान, नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष अनंत धडाम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर, सभापती सुनील बांदेकर, नगरसेवक गणेश भोगटे, एजाज नाईक तसेच युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक शेख यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. रमजानच्या उपचारासाठी त्याला काँग्रेसमार्फत पाच हजारांची तातडीची मदत देण्यात आली.
कुडाळ शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, माणसांना कुत्रे चावण्याचे प्रकारही वाढत आहेत. रात्री-अपरात्री तर शहरातील रस्त्यावरून येताना-जाताना या कुत्र्यांपासून मोठा धोका उद्भवत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
धोकादायक कुत्र्यांचा बंदोबस्त करणार : राणे
गत पंधरवड्यात झालेल्या दुसऱ्यांदा कुत्र्याच्या हल्ल्याने भटक्या कुत्र्यांचा दोन दिवसांत बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विनायक राणे यांनी दिली.
‘भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची’ चर्चा
गत पंधरवड्यापूर्वी ‘लोकमत’मध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत या मालिकेतून भटक्या कुत्र्यांचा धोका जाणवून देण्यात आला होता. तोच ही घटना घडल्याने या मालिकेची कुडाळ शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.
भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका
काही दिवसांपूर्वीच कुडाळ शहरात एका भटक्या कुत्र्याने दहाजणांचा चावा घेतला होता. ही घटना ताजी असतानाच त्याच्याहीपेक्षा अत्यंत धोकादायक हल्ला या कुत्र्यांनी केला असून, भटकी कुत्री धोकादायक ठरत आहेत.