‘त्या’ मासेमारीने मच्छिमार उध्वस्त होईल !

By admin | Published: July 8, 2016 10:57 PM2016-07-08T22:57:15+5:302016-07-09T00:57:37+5:30

मच्छिमारांनी व्यक्त केली भीती : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ‘माफियाराज’

Fishermen 'fishing' that will fester! | ‘त्या’ मासेमारीने मच्छिमार उध्वस्त होईल !

‘त्या’ मासेमारीने मच्छिमार उध्वस्त होईल !

Next

मालवण : सिंधुदुर्गसह महराष्ट्राच्या किनारपट्टीवर परप्रांतीय हायस्पीडच्या धुमाकुळाबरोबरच आता स्थानिक मच्छिमारांना ‘प्रकाशझोता’तील मासेमारीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षातील मासळीच्या लुटीनंतर शिल्लक असलेला मत्स्यसाठा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सिंधुदुर्गातील मच्छिमारांच्या संघर्षाला नवी समस्या तोंड वर काढत असून प्रखर विद्युत झोतातील मासेमारी सुरु राहिल्यास येथील मच्छिमार देशोधडीला लागून उध्वस्त होईल, अशी भीती मच्छिमार नेते गोपीनाथ तांडेल यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शासनाने मच्छिमारांना न्याय हक्काकडे नेहमीच दुर्लक्ष केला आहे. शासनकर्त्यांची अनास्थेची भूमिका मच्छिमारांसाठी मारक आहे. शासकीय यंत्रणाही कुचकामी असून त्यांचे मच्छिमार क्षेत्रावर अंकुश नाही. अन्यायाविरोधात संघर्ष करत असताना जिल्हा प्रशासन मच्छिमारांच्या पाठिशी राहत नाही, हे उघड सत्य आहे, असा आरोप कृष्णनाथ तांडेल यांनी केला.
मालवण येहील हॉटेल सागर किनारा येथे गिलनेट व ट्रॉलर्सधारक मच्छिमारांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी हायस्पीड मासेमारीबरोबरच प्रखर प्रकाशझोताच्या मासेमारीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी महेश देसाई, सुधीर जोशी, पिटर मेंडीस, नारायण आडकर, संतोष शेलटकर, विकी चोपडेकर, संतोष देसाई, नितीन आंबेरकर, संदीप शेलटकर, प्रसाद पाटील, नागेश परब, वासुदेव आजगावकर, प्रमोद खवणेकर आदी मच्छिमार उपस्थित होते.
किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना हरप्रकारचे नियम, निर्बंध असतात. मात्र, हेच नियम लागू न करता परप्रांतिय अनधिकृत व विनापरवाना बोटींना मोकळे रान करून दिले जात आहे. शासन व्यवस्था कमी पडत असून परप्रांतिय मच्छिमारांचे ‘माफियाराज’ सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सुरु आहे. या प्रकाराला शासनाची गस्त अडवत नसून अर्थकारण होते. आम्ही त्यांना अडवल्यास कायद्याचा बडगा दाखविला जातो, अशी भूमिका तांडेल यांनी मांडली. (प्रतिनिधी)

मालवणात १0७ ट्रॉलर्स
मत्स्य दुष्काळ व परप्रांतीय बोटींचे आक्रमण यात किनारपट्टी पोखरली गेली आहे. मच्छिमारांना वारंवार मत्स्य दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे मत्स्यखाते दुर्लक्षित आहे. परवाना अधिकारी अथवा कर्मचारी नसल्याची स्थिती आहे. मालवण बंदरात ३५० ट्रॉलर्सपैकी अवघे १०७ ट्रॉलर्स शिल्लक राहिले आहेत. यापुढे येथील मच्छिमारही देशोधडीला लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

पालकमंत्र्यांवर निशाणा
मच्छिमारांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. बोले तैसा चाले ही प्रवृत्ती पालकमंत्र्यांमध्ये नाही. परप्रांतिय नौकांचा बंदोबस्त करण्याचे दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. अन्य समस्याही जैसे थे आहेत. ज्या मच्छिमारांनी धाडस करून परप्रांतिय बोटी पकडल्या. त्यामुळे शासन तिजोरीत लाखोचा दंड जमा झाला आहे. मात्र शासनाने या मच्छिमारांचे कौतुकही केले नाही याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.


जलधी क्षेत्र वाढवावे
राज्याच्या सागरी क्षेत्राचा विचार १२ नॉटीकल मैल हे क्षेत्र स्थानिक मच्छिमारांसाठी राखीव आहे. मात्र जुन्या कायद्यानुसार हे क्षेत्र निश्चित आहे. त्यात बदल होणे गरजेचे आहे. १९८० नंतर मासेमारीत यांत्रिक बदल झाले. बोटींना १०० अश्वशक्ती प्राप्त झाली. त्यामुळे १२ नॉटीकल मैल क्षेत्र २५ नॉटीकल मैलपर्यंत वाढवावे. त्यामुळे परप्रांतियांचे आक्रमण कमी होईल. याबाबत शासनाने धोरण निश्चित करावे, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली.

Web Title: Fishermen 'fishing' that will fester!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.