पूल तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची चौकशी
By admin | Published: August 28, 2016 12:26 AM2016-08-28T00:26:05+5:302016-08-28T00:26:05+5:30
वायकर : गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे मुजवणार
रत्नागिरी : सहा वर्षांपूर्वी पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. गेल्या सहा वर्षांत जुन्या पुलांकडे लक्षच दिले गेलेले नाही. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरले जातील, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २०१० मध्ये सर्वच पुलांचे आॅडिट करण्यात आले होते. सहा वर्षांत आॅडिट झालेले नाही. तरीही जुन्या पुलांकडे दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत माहिती घेऊन चौकशी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. महामार्गावरील पुलांच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात ६७० साकव मोडकळीस आले आहेत. यामध्ये ज्या साकवांची स्थिती अगदीच वाईट असेल ते पाडून त्यांच्या जागी नवीन साकवांचे बांधकाम करण्यात येईल.
रत्नागिरी विमानतळावर एअर अॅम्ब्युलन्स उतरवता यावी, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यासाठी कार्डियाक अॅम्ब्युलन्स लॅबचे युनिट आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडून खर्च करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.
महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. याकडे पालकमंत्र्यांचे लक्षवेधले असता ते म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याची सूचना बांधकाम विभागाला केली आहे. दि. १ सप्टेंबरपासून हे खड्डे भरण्याचे काम वेगात करण्यात येणार असून, गणेशोत्सवापूर्वी ते पूर्ण होईल. हे खड्डे खडी व डांबराने भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गणवेशाचे पैसे वर्गखोल्यांना
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी डीपीडीसीमधून दिलेले तीन कोटी रुपये पडून आहेत. तसेच ग्रामीण भागातील शाळांच्या १५१ वर्गखोल्या मोडकळीस आल्या असून, त्या कधीही जमीनदोस्त होऊन अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणवेशाचे अनुदान वर्गखोल्यांसाठी वापरण्यासाठी वर्ग करण्यात येईल, असे वायकर यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमधील समन्वय हरविल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित झाला. याबाबत संबंधितांना बोलावून सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.