महाराष्ट्र निवडणूक 2019: बेईमानी करणाऱ्यांना जनतेनं चोख उत्तर दिलं- नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 17:34 IST2019-10-24T17:28:51+5:302019-10-24T17:34:12+5:30
सिंधुदुर्गातल्या कणकवली मतदारसंघातून सतीश सावंत यांचा पराभव करत नितेश राणेंनी विजय मिळवला.

महाराष्ट्र निवडणूक 2019: बेईमानी करणाऱ्यांना जनतेनं चोख उत्तर दिलं- नारायण राणे
कणकवली- सिंधुदुर्गातल्या कणकवली मतदारसंघातून सतीश सावंत यांचा पराभव करत नितेश राणेंनी विजय मिळवला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणेंनीही या विजयावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. बेईमानी करणाऱ्यांना जनतेचं चोख उत्तर दिल्याची भावना नारायण राणेंनी व्यक्त केली आहे.
या निवडणुकीत नितेश राणेंनी 20 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी मताधिक्यांची घोडदौड कायम राखली आहे. 19व्या फेरीअखेर 25,203 मताधिक्क्यांची निर्णायक आघाडी घेतल्यानंतर त्यांचा विजय झाला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीत फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय.
नारायण राणेंबरोबर 25 वर्षं राहिल्यानंतर सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. तसेच नितेश राणेंच्या एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीलाही सतीश सावंतांच्या उमेदवारीमुळे रंगत आली होती. शिवसेनेनंही नितेश राणेंना पाडण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती, युतीत भाजपाच्या वाट्याचा असलेला या मतदारसंघातही शिवसेनेनं अधिकृत उमेदवार म्हणून सतीश सावंतांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.