दर्जाहीन औषध पुरवठ्यामुळे आंबा बागायतदार, व्यापारी संकटात

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 24, 2024 03:41 PM2024-01-24T15:41:46+5:302024-01-24T15:42:05+5:30

कीटकनाशकांची तपासणी तज्ज्ञ पथकाकडून व्हावी; मालवण तालुका आंबा बागायतदार, व्यापारी यांची आग्रही मागणी

Mango grower trader in crisis due to substandard drug supply | दर्जाहीन औषध पुरवठ्यामुळे आंबा बागायतदार, व्यापारी संकटात

दर्जाहीन औषध पुरवठ्यामुळे आंबा बागायतदार, व्यापारी संकटात

सिंधुदुर्ग : बदलत्या हवामानामुळे संकटात सापडलेल्या आंबा बागायतदार, व्यापाऱ्यांना फवारणीसाठी मिळणारी औषधे ही दर्जाहीन स्वरूपात मिळत असल्याचे नवे संकट निर्माण झाले आहे. तुडतुडे, थ्रिप्स आदी कीड व कीटक रोगांना दूर ठेवण्यासाठी लाखो रुपयांची औषधी खरेदी करूनही त्याची परिणामकारकता मिळत नसल्याचे चित्र आहे.

याबाबत कृषी विभागाने बाजारात विक्रीस असलेल्या औषधांची तपासणी करावी, त्याबरोबरच शासनाने यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करून संकटात असलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा द्यावा. अशी मागणी मालवण तालुका आंबा बागायतदार आणि आंबा व्यापारी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, शासनाने आंबा बागायतदारांची व्यथा समजून घेऊन या बागायतदार, व्यापाऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने दर्जेदार स्वरूपातील औषधे अनुदान स्वरूपात मिळण्याबाबत कृषी विभागामार्फत पावले उचलावीत. अशीही मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.

मालवण तालुका आंबा बागायतदार आणि व्यापारी यांनी मंगळवारी सायंकाळी भरड दत्त मंदिर येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. यावेळी आप्पा चव्हाण, सुधीर मांजरेकर, जगदीश गावकर, संदीप गावकर, सिजर डिसोजा, मधुकर लुडबे, राजन लुडबे, दीपक शिंदे, राहुल सावंत, सचिन कांबळी, जयवंत लुडबे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

कीडरोगाचे प्रमाण वाढले

गेल्या काही वर्षांत सतत हवामान बदलाचा फटका आंबा व्यवसायाला बसत आहे. अवकाळी पाऊस, बदलता थंडीचा कालावधी, काही वेळा वाढणारा प्रचंड उष्मा या सर्वांमुळे आंबा बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. त्यासोबतच विविध कीटक व कीड रोगाचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र या हवामान बदलामुळे दिसून येते. त्यामुळे वारंवार फवारणी करण्याची वेळ सर्वच बागायतदारांवर आली आहे.

योग्य ती कार्यवाही करावी

आंबा पिकाकडे कृषी विभागाने, अधिकारी वर्गाने ज्या गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, अशी कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आंबा बागायतदार, व्यापारी मोठ्या संकटात असून मोठा आर्थिक फटकाही बसत आहे. शासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कृषी विभागाला आदेश देत योग्य ती कार्यवाही करावी. बाजारात मिळणारी कीटकनाशके यांचीही तपासणी तज्ज्ञ पथकाकडून करण्यात यावी, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.

Web Title: Mango grower trader in crisis due to substandard drug supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.