मनसेचे धरणे आंदोलन

By admin | Published: October 19, 2015 10:47 PM2015-10-19T22:47:23+5:302015-10-19T23:49:10+5:30

केंद्र, राज्यशासनाचा निषेध : वाढत्या महागाईवरून टीकाटिप्पणी

MNS protest movement | मनसेचे धरणे आंदोलन

मनसेचे धरणे आंदोलन

Next

ओरोस : केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील युती सरकार महागाई कमी करण्याच्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करत आहे. महागाई गगनाना भिडली असून विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांचे या थापाड्या सरकारला सोयरसुतक नाही. वाढीव महागाई आटोक्यात आणण्यात अपयशी ठरलेल्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन छेडले.सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाईला आळा घालण्यात अपयशी सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी धीरज परब, महिला अध्यक्षा भारती रावराणे, चैताली भेंडे, श्रेया देसाई, दत्ताराम गावकर, शैलेश अंधारी, जयसिंग नाईक, अशोक रावराणे, बाळा पावसकर, माधवी दळवी, सुवर्णा मुंज यांच्यासह मनसे पदाधिकारी, विद्यार्थी संघटनेचे कणकवली तालुकाध्यक्ष संदेश परब, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रातील भाजपाप्रणित मोदी सरकारने महागाई कमी करण्याचे सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन दिले होते. परंतु पंतप्रधान मोदी हे विदेश दौऱ्यात व्यस्त असून सामान्य जनतेकडे बघायला त्यांना वेळ नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महागाईविरोधात आंदोलने छेडत आहेत. आम्ही तुम्हांला अच्छे दिन दाखविणार आहोत अशाप्रकारे वल्गना करणारे फक्त मोदी हे विदेश दौऱ्यावर आपल्या जेवणाच्या मोठ्या मेजवान्या घेत आहेत. गरीब जनता महागाईने होरपळली आहे. जतनेला दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. तूरडाळीचा दर २०० रुपयांपर्यंत पोहोचला असून तांदुळ ४० ते ८० रुपये व अन्य भाजीपाला, कांदे, बटाटे १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, असे धीरज परब म्हणाले. यावेळी भारती रावराणे, धीरज परब, शैलेश अंधारी, जयसिंग नाईक यांनी विचार मांडले. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन महागाईविरोधात शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)

चैताली भेंडे : शासन जनतेची पिळवणूक करतेय
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष चैताली भेंडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महागाई विरोधी आंदोलन उभारले असून महागाई कमी होईपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार असे सांगितले. काँग्रेस सत्तेवर असताना महागाई व विकासाचे गाजर दाखवणाऱ्या मोदींच्या हाती केंद्रातील सत्ता जनतेने दिली. परंतु मोदी विदेश दौऱ्यात व्यस्त आहेत. भारतातील जनतेकडे पहायला त्यांना वेळ नाही. सामान्य जनतेला डाळ, भात व जीवनावश्यक वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. हे सरकार जनतेची पिळवणूक करत आहे.
गरीबाच्या तोंडाचा घास काढून घेणाऱ्या आणि महागाई कमी करण्याच्या आश्वासनांनी जनता हैराण झाली असून आता या सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे. थापा मारणारे आणि विकासाला खीळ घालणारे सरकार आहे. जनतेने जागृत होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता द्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी केले. महागाई कमी करण्याचे थापा मारत पंचपक्वांने खाण्यात दंग असलेले सरकार गरीबांकडे लक्ष देत नाही. सामान्य जनतेची सरकारला काही चिंता नाही, असा आरोप त्यांनी केला.

Web Title: MNS protest movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.