राऊत-सामंत वाद हा राणे यांनी लावलेला जावईशोध!, खासदार विनायक राऊतांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 04:21 PM2021-12-25T16:21:34+5:302021-12-25T16:22:23+5:30

कणकवली : किरण सामंत विरुद्ध विनायक राऊत हा नसलेला वाद आमदार नितेश राणे यांनी लावलेला जावईशोध आहे. स्वतः करायचे आणि त्याचे ...

MP Vinayak Raut criticizes MLA Nitesh Rane | राऊत-सामंत वाद हा राणे यांनी लावलेला जावईशोध!, खासदार विनायक राऊतांचा टोला

राऊत-सामंत वाद हा राणे यांनी लावलेला जावईशोध!, खासदार विनायक राऊतांचा टोला

Next

कणकवली : किरण सामंत विरुद्ध विनायक राऊत हा नसलेला वाद आमदार नितेश राणे यांनी लावलेला जावईशोध आहे. स्वतः करायचे आणि त्याचे खापर इतरांवर फोडायचे हा नितेश राणे यांचा पूर्वीपासूनचा धंदा आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी पोलीस खऱ्या आरोपीला लवकरच समोर आणतील त्यावेळी नितेश राणे यांचे उखळ पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला.    
      
कणकवली विजय भवन मध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, संजय आग्रे, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना समन्वयक राजू राठोड, संदेश सावंत- पटेल, राजू रावराणे,शांताराम रावराणे आदी उपस्थित होते.
 
यावेळी खासदार राऊत म्हणाले, आमदार नितेश राणे यांनी माझ्याबरोबरच किरण सामंत व आमदार वैभव नाईक यांची चिंता करू नये. त्यांनी स्वतःची चिंता करावी.    
        
किरण सामंत लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत का? असा प्रश्न राऊत यांना विचारला असता लोकसभा निवडणुकीला अजून पुष्कळ दिवस आहेत. किरण सामंत इच्छुक असतील किंवा नसतील मला माहीत नाही. मात्र, इच्छुक कोणीही राहू शकतो, त्यात गैर असे काहीच नाही असेही ते म्हणाले.       
 
ते पुढे म्हणाले, स्वतःच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडायची ही विकृती नारायण राणे यांच्या घराण्याने निर्माण केली आहे. ती शिवसेनेने केलेली नाही. शिवसैनिक स्वतःच्या कार्यकर्त्याचे रक्त कदापिही सांडत नाहीत. तर शिवसैनिक हा स्वतःच रक्त देऊन इतरांचे जीव वाचवतो. सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर, अंकुश राणे या घटनांचा संदर्भ देत खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर यावेळी  टीका केली. 

तसेच जिल्हा बँकेमध्ये सतीश सावंत बाजी मारणार हे समजताच त्यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यात आला. मात्र, आमचा पोलिसांवर विश्वास असून ते या प्रकरणातील खऱ्या आरोपींपर्यंत निश्चित पोहचतील. असेही राऊत म्हणाले.  

हा तर कोकणचा अपमान ! 

म्याव , म्याव करणे हा कोकणचा अपमान आहे. ही कोकणची परंपरा नाही. मात्र, नितेश राणे यांनी तसे केले आहे. लोकांनी त्याचे वागणे पाहिले आहे. ते वागणे योग्य नाही. 

केंद्राने जीएसटीचे ५६ हजार कोटी दिले पाहिजेत    

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट आम्ही खासदारांनी दिल्ली येथे घेतली.  चांगल्या कामांसाठी आम्ही पंतप्रधानाना भेटतच असतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. आम्ही बालिशपणा करत नाही. पंतप्रधानांनी आवर्जून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. पेट्रोल व डिझेल कर कपात करायची असेल तर राज्य शासनाला ५६ हजार कोटी जीएसटीचे केंद्र शासनाने दिले पाहिजेत.  त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत. केंद्राकडून ६० हजार कोटी पेक्षा जास्त येणे राज्य सरकारला  आहे. ते दिल्यास  बरे  होईल,असेही ते म्हणाले. 

Web Title: MP Vinayak Raut criticizes MLA Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.