राज्यातील वनक्षेत्रात रत्नागिरी जिल्हा दुसरा
By Admin | Published: September 9, 2016 11:35 PM2016-09-09T23:35:53+5:302016-09-10T00:14:42+5:30
५२ टक्के वनक्षेत्र : खेड तालुक्यातील २ हजार ५९४ हेक्टर क्षेत्र जंगली; गुहागर, संगमेश्वरात कमी
सुभाष कदम -- चिपळूण --रत्नागिरी जिल्ह्यात ५२ टक्के वनक्षेत्र असून, राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे. राज्यात गडचिरोलीचा पहिला तर रत्नागिरी जिल्ह््याचा जंगलाच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो.
जंगले वाढावी, त्यांचे संवर्धन व्हावे, जंगलातील लहानलहान जीव सुखाने नांदावेत, जंगलातील पेटंट कायम राहून त्याचा लाभ स्थानिकांना मिळावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ५२ टक्के वनक्षेत्र असून, खेड तालुक्यात २५९४ हेक्टर तर संगमेश्वर तालुक्यामध्ये २६७ हेक्टर वनक्षेत्र आहे. सर्वात जास्त वनक्षेत्र हे खेड तालुक्यात तर सर्वात कमी वनक्षेत्र हे संगमेश्वर तालुक्यात आहे. संगमेश्वरमधील वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असून, दरवर्षी येथे लाखो नवीन झाडे लावली जातात.
शासनस्तरावर जंगले वाचविण्यासाठी वन संवर्धन अधिनियम १९८० तयार करण्यात आला असून, या अंतर्गत जंगल कसे असावे, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यात आली आहेत. तर वृक्षतोड अधिनियम १९६४ अंतर्गत वृक्षतोडीस परवानगी देणे व दंड आकारणे, आदी गोष्टी येतात. या अधिनियमात १९८९मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. भारतीय वन अधिनियम १९२७नुसार तोडलेल्या मालाच्या वाहतुकीला परवानगी देता येते. तर १९६६चा जमीन महसूल अधिनियम महसूल विभागाकडे येतो. बिगर मनाई झाडांची तोड झाल्यास या अधिनियमाद्वारे कारवाई केली जाते. जैविक विविधता संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने २००८ मध्ये कायदा केला आहे. या अधिनियमानुसार जंगल संवर्धनाचा हक्क स्थानिकांना मिळतो. नैसर्गिक साधनसंपत्तीची नोंद आता ग्रामस्तरावर ठेवली जाणार आहे.
कोकणात वनातील वणव्यांचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी जंगलांना आगी लावल्या जातात. त्यामुळे आंबा, काजू बागांबरोबरच विविध औषधी व दुर्मीळ जातीच्या वनस्पती या आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. सरपटणारे प्राणी, लहान कीड, मुंग्या व लहान प्राणी यामध्ये जळून खाक होतात. यामुळे जैविक विविधतेलाही धोका निर्माण झाला आहे. यासाठी शासनाकडून वणवामुक्त गाव अभियान राबविण्यात येत असून, ग्रामस्थांनी यासाठी शासनाला सहकार्य करावे. तसेच वन संवर्धन ही काळाची गरज असून, त्यासाठी आता जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.
- विकास जगताप, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण)
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड २५९४, लांजा १२७५, दापोली ९६२, चिपळूण ६०५, रत्नागिरी ३३४, मंडणगड ३०२, राजापूर ३००, गुहागर २९६ आणि संगमेश्वर २६७ हेक्टर क्षेत्र हे जंगलांनी वेढलेले आहे. सर्वात जास्त जंगल हे खेड व लांजा तालुक्यात तर सर्वात कमी जंगल हे गुहागर व संगमेश्वर तालुक्यात आहे. वनखात्यातर्फे त्याचे संवर्धन केले जाते. वन विभागाचे कर्मचारी या भागात सदैव कार्यरत असतात.