सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘स्टॉप डायरिया’ अभियान, सीईओ मकरंद देशमुख यांची माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 10, 2024 05:34 PM2024-07-10T17:34:29+5:302024-07-10T17:34:57+5:30

पाण्याच्या सुरक्षित वापराबाबत विविध स्पर्धा

Stop Diarrhea campaign in every village of Sindhudurg district, information from CEO Makarand Deshmukh | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘स्टॉप डायरिया’ अभियान, सीईओ मकरंद देशमुख यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘स्टॉप डायरिया’ अभियान, सीईओ मकरंद देशमुख यांची माहिती

गिरीश परब

सिंधुदुर्ग : जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ‘स्टॉप डायरिया’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्हावासीयांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले आहे.

या अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. यासाठी गावस्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. एकूण आठ आठवडे हे अभियान चालणार असून, प्रत्येक आठवड्यात वेगवेगळे उपक्रम गाव पातळीवर घेण्यात येणार आहेत. अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

या कार्यशाळेमध्ये पाणी शुद्ध करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार आहे व शुद्ध पाण्याचे महत्त्व सांगितले जाणार आहे. या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता जागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणीबाबत गाव पातळीवर पोस्टर, बॅनर्स लावण्यात येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता चावडी सुरू करण्यात येणार आहे. गावातील शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे स्वच्छता जागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

ग्रामस्थांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत जनजागृती

ग्रामस्थांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागृती निर्माण करणे यासाठी घरोघरी भेटी देऊन, कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे, यामध्ये जैविक व अजैविक कचरा स्वतंत्र बकेटमध्ये ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. अंगणवाड्यांमध्ये माता व किशोरी मुलींची स्वच्छता, आरोग्य आदी विषयांवर मार्गदर्शन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे.

सर्व शाळांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती सत्र

पाणीपुरवठा योजनेतील पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे, नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करण्याची मोहीम ग्रामपंचायतने हाती घेऊन शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी असलेल्या शौचालयांची दुरुस्ती करणे, प्रत्येक शाळेमध्ये विशेष स्वच्छता संमेलन भरवण्यात यावे. यामध्ये माध्यान्ह भोजन, स्वच्छता व स्वच्छतेबद्दल जागृती सत्र घेण्यात येणार आहे.

अभियानात सर्व घटकांचा सहभाग घेणार

गावामध्ये ग्रे वॉटर मॅनेजमेंटबाबत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये विशेषकरून प्रत्येक सेप्टिक टँक असलेल्या शौचालयांना शोषखड्डे तयार करणे, घरातील सांडपाणी, परसबाग किंवा शोषखड्डा करून त्यातच पाणी सोडणे हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता याबाबत गावांना सक्षम करण्यासाठी गावातील सर्व घटकांचा या अभियानामध्ये सहभाग घेण्यात येणार आहे.

पाण्याच्या सुरक्षित वापराबाबत विविध स्पर्धा

छतावर पडणारे पावसाचे पाणी संकलित करून पावसाचे पाणी साठवण्याच्या तंत्राबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्र/जलस्रोत इत्यादीभोवती स्वच्छता आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. शालेय स्तरावर अतिसारचा सामना करण्यासाठी सुरक्षित पाण्याचा वापर या विषयावर चित्रकला, निबंध लेखन, घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविकांकडून सुरक्षित पाणी वापराच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. स्टॉप डायरिया अभियान गाव पातळीवर यशस्वीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Stop Diarrhea campaign in every village of Sindhudurg district, information from CEO Makarand Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.