Sindhudurg: वेंगुर्ल्यातील पर्यटनस्थळे विविध समस्यांच्या गर्तेत अडकली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:34 IST2025-03-04T18:33:58+5:302025-03-04T18:34:31+5:30
त्रुटी दूर केल्यास नवी झळाळी

Sindhudurg: वेंगुर्ल्यातील पर्यटनस्थळे विविध समस्यांच्या गर्तेत अडकली !
प्रथमेश गुरव
वेंगुर्ला : पर्यटनदृष्ट्या संपन्न असलेल्या वेंगुर्ला शहरातील दीपगृह आणि सूर्यास्त दर्शन या स्थळांकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, याठिकाणी जाण्यासाठी अन्य कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने दुरवस्था झालेल्या रस्त्यावरूनच देशी-विदेशी पर्यटक ये-जा करत आहेत. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी ‘स्वच्छ सुंदर वेंगुर्ल्यामध्ये पर्यटकांचे स्वागत’ अशा आशयाचे प्रवेशद्वार होणेही गरजेचे बनले आहे.
वेंगुर्ला तालुक्याला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. येथील स्वच्छ समुद्रकिनारे पाहून पर्यटक अशा किनाऱ्यांना पसंती देतात. तालुक्यासोबतच वेंगुर्ला शहरही पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत आहे. अलीकडेच झालेला झुलता पूल पर्यटकांना आकर्षित करत आहे. तर समुद्रातील बोटींना दिशादर्शक ठरणारा दीपगृह वेंगुर्ला शहराच्याच हद्दीत येत आहे. या दीपगृहाशेजारीच सूर्यास्त दर्शन पॉईंटही आहे. बरेच देशी-विदेशी पर्यटक दीपगृह पाहण्यासाठी आणि सूर्यास्त दर्शनाचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. परजिल्ह्यातील तसेच घाटमाथ्यावरील पर्यटकांना दीपगृहाचे कुतूहल वाटत असल्याने तेथील नागरिक आणि शाळा-महाविद्यालयांच्या सहली याठिकाणी भेट देत आहेत.
सागरी महामार्गालगत असलेल्या निमुजगा परिसरातून दीपगृहाकडे जाताना विस्तीर्ण असा लांबच लांब नवाबागपर्यंतचा समुद्रकिनारा आपल्या नजरेस पडतो. याठिकाणी उभे राहून वेंगुर्ला शहराचेही दर्शन होते. परंतु, हा स्पॉट झाडाझुडपांनी वेढलेला असल्याने पर्यटकांच्या नजरेतून दुर्लक्षित राहिला आहे. आजूबाजूला झाडी वाढल्याने समुद्राचे नीट दर्शन होत नाही. याठिकाणी असलेल्या डांबरी रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डेही पडले आहेत. पण निसर्गसौंदर्याची भुरळ पडलेले पर्यटक दुरवस्था झालेल्या रस्त्यावरूनच मार्गक्रमण करत पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.
स्वच्छतागृहे होणे क्रमप्राप्त
स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या वेंगुर्ला नगर परिषदेने या भागातही अधूनमधून स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. पर्यटनाच्या अनुषंगाने याठिकाणी स्वच्छतागृहे होणे क्रमप्राप्त आहे. एकीकडे शहरातील स्वच्छतेसाठी नगर परिषद लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र, दुसरीकडे पर्यटन क्षेत्रातील ही केविलवाणी परिस्थिती चिंतेची बाब ठरत आहे.
त्रुटी दूर केल्यास नवी झळाळी
दरम्यान, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून २ मार्च रोजी निमुजगा भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोठ्या प्रमाणावर कचरा उचलल्याने याठिकाणी आता समुद्राचा काही भाग नजरेस पडत आहे. त्यांच्या या स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे चित्र आहे. पर्यटनाच्या आणि वेंगुर्ला शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने याठिकाणी असलेल्या त्रुटी दूर झाल्यास येथील भागाला नवी झळाळी प्राप्त होईल.
प्रवेशद्वार झाल्यास पर्यटकांना निश्चितच फायदा
- काही वर्षांपूर्वी वेंगुर्ला नगर परिषदेने शहराच्या हद्दीत चारही बाजूने प्रवेशद्वार उभारण्याचा ठराव केला होता. यातील भटवाडी वेशी आणि अणसूर नाका येथे अशी दोन प्रवेशद्वारे अस्तित्वात आली. परंतु, जी प्रवेशद्वारे निर्माण व्हायची राहिली आहेत ती पर्यटकांच्या दृष्टीने अतिमहत्त्वाची आहेत.
- निमुजगा भागात प्रवेशद्वार नसल्याने दाभोलीमार्गे वेंगुर्ला शहरात प्रवेश करत असताना आपण नेमके कुठे आलो, याबाबत पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
- याठिकाणी प्रवेशद्वार झाल्यास निश्चितच त्याचा फायदा पर्यटकांना होणार आहे आणि याच प्रवेशद्वाराजवळ दीपगृह आणि सूर्यास्त दर्शन स्पॉट प्रकाशझोतात आणल्यास पर्यटकांची संख्या वाढू शकेल.
संरक्षक भिंत नसल्याने धोका
स्थानिकही या भागात चालण्यासाठी तसेच हवापालटासाठी नेहमी येत असल्याने येथील गैरसोयीचा त्यांनाही त्रास होत आहे. तर मुख्य मार्गावर सूर्यास्त दर्शनाच्या मार्गदर्शक फलकाचीही केविलवाणी परिस्थिती झाली आहे. तसेच या फलकाच्या समोरील बाजूला प्रचंड झाडी वाढल्याने येथील सोफ्यांवर बसणे गैरसोयीचे बनले आहे. मार्गावर असलेले पथदीपही झाडाझुडपांमधून प्रकाश पसरवत आहेत. याठिकाणी फोटोग्राफी करण्यासारखे सुद्धा काही स्पॉट आहेत. परंतु, त्याठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने धोका निर्माण झाला आहे.