लाटेत पुन्हा नौका उलटली
By admin | Published: August 18, 2016 11:34 PM2016-08-18T23:34:17+5:302016-08-18T23:34:19+5:30
तळाशील येथील नौका : आठवड्यातील तिसरी घटना; चार मच्छिमार बचावले
मालवण, आचरा : गेल्या आठवड्याभरात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर नौका उलटल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. मालवण, वायरीपाठोपाठ तळाशील येथील बोट मुणगे किनारी उलटण्याची घटना घडली आहे. मुणगे आपेची येळ (ता. देवगड) समुद्र किनाऱ्यालगत मासेमारी करीत असताना जोरदार लाटांच्या माऱ्यात फायबर नौका (पात) उलटून त्यात असलेले चार मच्छिमार समुद्रात फेकले गेले. चारही मच्छिमारांनी पोहत समुद्र किनारा गाठला. ही घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.
तळाशील येथून लक्ष्मी विष्णू शेलटकर यांच्या मालकीची फायबर पात घेऊन मुणगेच्या दिशेने पहाटे चार वाजता प्रथमेश शेलटकर, परेश शेलटकर, अनिरुद्ध जुवाटकर, रामा मायबा हे मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी मुणगे आपेची येळ येथील किनाऱ्यालगत मासेमारी करीत असताना सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान जोरदार लाटांच्या तडाख्यात पात उलटून खडकाळ भागात आदळल्याने पातीसह इंजिन व जाळ्यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मच्छिमारांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
२४ तासांतील दुसरी घटना : ११ बचावले
दरम्यान, नौका उलटण्याची घटना घडल्यावर जवळ मासेमारी करीत असलेल्या करण कांदळगावकर यांच्या नौकेतील मच्छिमारांनी तळाशील येथील मच्छिमारांना कल्पना दिली. त्यानंतर तळाशील येथील ८०-९० मच्छिमार बांधवांनी मुणगेच्या दिशेने धाव घेतली. मच्छिमारांनी खडकाळ भागात अडकलेली नौका बाहेर काढून किनाऱ्यावर आणली. या अपघातात पातीचे (नौका) मोठे नुकसान झाले आहे. पात चार दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आल्याचे समजते. अशाच पद्धतीची रापण नौका वायरी किनाऱ्यावर बुधवारी उलटण्याची घटना घडली होती. यात समुद्रात फेकले गेलेले सात मच्छिमार सुदैवाने बचावले होते.
मासेमारी बंदी कालावधी ९० दिवासांचाच हवा
मासेमारी बंदी कालावधी हा प्रामुख्याने ९० दिवसांचा असावा, अशी मागणी गेली काही वर्षे मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. १ जून ते ३१ जुलै हा कालावधी जरी मासेमारी बंदी कालावधी म्हणून जाहीर असला, तरी १ आॅगस्टनंतरही समुद्रात वाऱ्याचा व लाटांचा प्रचंड वेग असतो. त्यामुळे मासळीच्या प्रजोत्पादनासाठी ९० दिवसांचा कालावधी गरजेचे आहे. तसेच बंदी कालावधी ९० दिवसांचा झाल्यास मच्छिमार बांधवांची सुरक्षाही अबाधित राहील. त्यामुळे बंदी कालावधी १५ मे ते १५ आॅगस्ट असा करण्याचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केले आहे.