पाण्यातील ऑक्सिजनची पातळी झाली कमी; हवेतील श्वास घेण्यासाठी मासे किनाऱ्यावर
By शीतलकुमार कांबळे | Updated: June 5, 2024 19:20 IST2024-06-05T19:19:51+5:302024-06-05T19:20:17+5:30
मागील काही दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाचे पाणी तलावात मिसळल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली.

पाण्यातील ऑक्सिजनची पातळी झाली कमी; हवेतील श्वास घेण्यासाठी मासे किनाऱ्यावर
सोलापूर : श्री सिद्धेश्वर तलावातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली आहे. यामुळे तलावातील माश्याना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. म्हणून मासे तलावाच्या किनाऱ्यावर येऊन श्वास घेत आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाचे पाणी तलावात मिसळल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली. यासोबतच वीज जेव्हा कडाडते त्यामुळे हवेतील नायट्रोजन विरघळून नायट्रिक बनते. हे नायट्रिक पावसाच्या थेंबासोबत जमिनीवर येते. सगळीकडून आलेले पाणी तलावात मिसळते. त्यामुळे तलावातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
कमी जागेत जास्त मासे असल्यास त्यांना ऑक्सिजनची अधिक गरज पडते. पावसाचे प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे आणखी ऑक्सिजन कमी होते. पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर तोंड काढत असल्याचे दिसून आले. २७ मे रोजी प्रदूषित पाण्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले.
प्रदूषणाची व्हावी तपासणी
शहरात ज्याप्रमाणे हवा व ध्वनीच्या प्रदूषणाच्या पातळीची तपासणी होते, त्याचप्रमाणे तलावातील पाण्याची तपासणी व्हावी यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रदूषणाची तपासणी केल्यानंतर ते कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेला सांगावे. महापालिकेने तलावाचे सुशोभीकरण करण्याऐवजी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे, मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी सांगितले.