आसरा रेल्वे पुलावरील वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सुटणार; नितीन गडकरींनी केले २८ कोटी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:18 IST2022-07-20T18:17:58+5:302022-07-20T18:18:24+5:30
Asra railway bridge : आसरा पुलावर दररोज वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे या पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी होत होती. विविध संघटनांनी ही याबाबत आमदार देशमुख यांच्याकडे मागणी केली होती.

आसरा रेल्वे पुलावरील वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सुटणार; नितीन गडकरींनी केले २८ कोटी मंजूर
सोलापूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आसरा उड्डाणपुलासाठी गडकरी यांनी २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून होणाऱ्या कामामुळे आसरा पुलावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.
आसरा पुलावर दररोज वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे या पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी होत होती. विविध संघटनांनी ही याबाबत आमदार देशमुख यांच्याकडे मागणी केली होती. आमदार देशमुख यांनी स्वतः आसरा पुलावर जाऊन याची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. याशिवाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन बैठकही घेत आराखडा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिका या पूलासाठी २६ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला होता.
एप्रिल महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोलापूर दौऱ्यावर आले असता आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांच्याकडे आसरा पुलासाठी निधीची मागणी केली होती. यावेळी गडकरी यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आमदार देशमुख यांनी वारंवार गडकरींची भेट घेऊन याचा पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुरावाला यश आले असून नितीन गडकरी यांनी या पुलासाठी तब्बल २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
गडकरी जे बोलतात ते करतात: आ. देशमुख
नितीन गडकरी हे जे बोलतात ते करतातच याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आह. ते सोलापूर दौऱ्यावर आले असता आपण त्यांना केवळ दोनच मिनिटात आसरा पुलाची परिस्थिती सांगितली होत. त्यांनी तात्काळ या पुलासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पाळले आहे आणि निधी मंजूर केला आहे, असे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हणत गडकरी यांचे आभार मानले.