टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो..; टॉप IT कंपन्यांमध्ये नोकभरती घटली, काय आहे कारण ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:39 IST2025-01-20T16:38:48+5:302025-01-20T16:39:14+5:30
Tech Companies Hiring :सध्या भारतातील आयटी क्षेत्रात सूमारे 54 लाख कर्मचारी काम करतात.

टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो..; टॉप IT कंपन्यांमध्ये नोकभरती घटली, काय आहे कारण ?
Tech Companies Hiring : भारतातील IT क्षेत्रात 50 लाखांहून अधिक तरुणांना रोजगार मिळाला आहे. पण, आता या क्षेत्रात AI तंत्रज्ञान आल्यामुळे अनेक मोठे बदल घडताना पाहायला मिळत आहेत. AI च्या वापराने अनेक कामे ऑटोमॅटिक होत आहेत, त्याचा परिणाम आयटी कंपन्यांच्या नोकरभरतीवरही दिसून येत आहे. डिसेंबर तिमाहीत देशातील प्रमुख 5 आयटी कंपन्यांमधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2,587 ने कमी झाली आहे, तर सप्टेंबर तिमाहीत ही संख्या 15,033 ने वाढली होती.
या कालावधीत इन्फोसिस आणि एचसीएलने 7,725 लोकांना कामावर घेतले, तर देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्या TCS, विप्रो आणि टेक महिंद्रा यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या घटली. या पाच आयटी कंपन्यांनी FY24 च्या डिसेंबर तिमाहीत त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या 12,132 ने कमी केली. FY24 च्या मार्च तिमाहीत एकूण 12,600 कर्मचारी कमी झाले. आर्थिक वर्ष 2025 ची शेवटची तिमाही सुरू आहे आणि उद्योग तज्ञांचा असा विश्वास आहे की, यावेळी आयटी क्षेत्रात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत एक चतुर्थांश कमी असेल.
गेल्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत 60,000 ची निव्वळ वाढ झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या 54 लाखांवर पोहोचली आहे. IT इंडस्ट्री बॉडी NASSCOM ने तपशील दिलेला नाही, परंतु मोठ्या IT कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत झालेली घट लक्षात घेता, असे मानले जाते की, बहुतांश भरती ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC) मुळे होते. GCC सलग दुसऱ्या वर्षी निव्वळ वाढीमध्ये IT कंपन्यांना मागे टाकतील.
एव्हरेस्ट ग्रुपचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष पीटर बेंडर-सॅम्युअल यांनी सांगितले की, कोव्हिडदरम्यान उद्योगाने मोठ्या संख्येने लोकांची भरती केली. तेव्हापासून त्यांनी भरतीत कमालीची घट केली आहे. एचसीएलटेकचे सीईओ सी विजयकुमार म्हणाले की, आयटी कंपन्यांनी कमी कर्मचाऱ्यांमध्ये महसूल उत्पादकतेत वाढ केली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने महसूलही वाढेल, असे नाही.