उपायुक्त दौऱ्यानंतरही ‘कचरा’कोंडी "

By admin | Published: June 23, 2017 05:42 AM2017-06-23T05:42:03+5:302017-06-23T05:42:03+5:30

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरसकर यांनी डोंबिवली पूर्वेतील म्हात्रेनगर आणि स्वा. सावरकर रोड या दोन प्रभागांचा गेल्या आठवड्यात पाहणी दौरा

After the visit of the Deputy Commissioner, the 'garbage' | उपायुक्त दौऱ्यानंतरही ‘कचरा’कोंडी "

उपायुक्त दौऱ्यानंतरही ‘कचरा’कोंडी "

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरसकर यांनी डोंबिवली पूर्वेतील म्हात्रेनगर आणि स्वा. सावरकर रोड या दोन प्रभागांचा गेल्या आठवड्यात पाहणी दौरा केला होता. मात्र त्यांच्या दौऱ्यानंतरही ‘कचरा कोंडी’ कायम असल्याचे सांगत नगरसेवकांनी ‘लोकमत’जवळ नाराजी व्यक्त केली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कचरा विल्हेवाटीच्या नियोजनाचा अभाव असल्यामुळे शहरांना आलेली बकाली आणि त्यामुळे देशभरातील गलिच्छ शहरांमध्ये महापालिकेची गणती झाल्याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर टिकेची झोड घेतली होती. त्याची दखल घेत उपायुक्तांनी दौरा केला होता.
तोरसकर यांच्या पाहणी दौऱ्यात सहायक सार्वजनिक आरोग्याधिकारी विलास जोशी, प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत देगलुकरकर यांना फैलावर घेत अस्वच्छतेच्या कारणावरून कानउघाडणी केली होती. त्यांनी दुर्गंधी आणि घाणीबद्दल नाराजी व्यक्त करत कचरा टाकणाऱ्यांना नोटीस द्या, असे आदेश दिले होते. मंगळवारी पुन्हा येणार असल्याचे उपायुक्त म्हणाले होते, परंतु महासभेमुळे ते येऊ शकले नाहीत. मात्र तोरसकर यांच्या आदेशानंतरही अद्यापपर्यंत कोणालाही नोटीस बजावली नसल्याची माहिती ग प्रभाग समितीचे सभापती आणि नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोणाला नोटीस दिली आहे का? यासंदर्भात जोशी यांना विचारणा केली असता, आतापर्यंत दंडात्मक कारवाई मात्र कोणावरही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनीच उपायुक्तांच्या आदेशाकडे कानाडोळा केला का, असा सवाल पेडणेकर यांनी केला.
म्हात्रेनगरसंदर्भात उपायुक्तांच्या दौऱ्यानंतर कोणताही विशेष बदल झाला नसल्याचे सांगण्यात आले. तेच मत स्वा. सावरकर रोड या प्रभागाचे नगरसेवक संदीप पुराणिक यांनीही व्यक्त केले. वरिष्ठांची जरी इच्छाशक्ती असली तरी प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीचा आभाव असल्याने सर्व समस्या असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दत्तनगर, संगितावाडी आदी प्रभागांमध्ये खासगी सफाई कामगारांकडून प्रभागातील गटारे, ड्रेनेज आदीची स्वच्छता करण्यात येत आहे. हे वॉर्ड महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांच्यासह नगरसेविका भारती मोरे यांचे आहेत. पण तरीही दिवसाला हजारो रुपये खर्च करून गेले आठवडाभर वॉर्डांमध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे.
जिथे तक्रार तिथे कामगार :
यासंदर्भात राजेश मोरे म्हणाले की, दुसरा इलाजच नाही. खासगी कामगारांना आधी रोख रक्कम द्यावी लागते. प्रभागांमधील नागरिकांची मागणीच असल्याने स्वच्छतेची सुविधा द्यायलाच लागते. शहरात डेंग्यूच्या घटना आधी घडल्या आहेत. त्यात दत्तनगरमधील रहिवाश्यांचाही समावेश होता. त्यात आता पावसाळा सुरू झाला आहे, साथरोगांसह अन्य रोग होऊ नयेत, सगळ्यांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. कमी अधिक पावसाच्या सरींमुळे जिथे पाणी साचते, त्यातून रोगराई वाढण्याची शक्यता आहे. ते होऊ नये याची खबरदारी घेत महापालिकेच्या सफाई कामगारांची प्रतीक्षा न करता खासगी कामगारांकडून स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. दिवसाला दहा ते पंधरा खासगी सफाई कामगार प्रभागांमध्ये कार्यरत असून, जिथे तक्रार तिथे कामगार असे धोरण अवलंबण्यात आल्याचे मोरे म्हणाले.

Web Title: After the visit of the Deputy Commissioner, the 'garbage'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.