भिवंडी शहरामध्ये उडाला स्वच्छ भारत योजनेचा बोजवारा

By admin | Published: April 10, 2017 05:30 AM2017-04-10T05:30:40+5:302017-04-10T05:30:40+5:30

भिवंडी महापालिका डबघाईला आली असल्याने शहरात विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे

Bhiwawa of Clean India Scheme in Bhiwandi City | भिवंडी शहरामध्ये उडाला स्वच्छ भारत योजनेचा बोजवारा

भिवंडी शहरामध्ये उडाला स्वच्छ भारत योजनेचा बोजवारा

Next

भिवंडी महापालिका डबघाईला आली असल्याने शहरात विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे. कर्मचाऱ्यांना दोन ते तीन महिने पगारही मिळत नाही. ही परिस्थिती सुधारावी, असे कुणालाही वाटत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पालिकेची अशीच दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू राहिल्यास आर्थिक विकासाचे केंद्र बनवण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न कधीच सत्यात उतरणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ ठरू शकेल.

वंडीतील झोपडपट्ट्यांमधील स्थिती पाहिली, तर येथील नागरिक अक्षरश: नरकयातना भोगत असल्याचे जाणवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिला आहे. त्यादृष्टीने अनेक महापालिकांनी याकामी पुढाकार घेतला आहे. काही ठिकाणी विविध उपक्रम राबवून स्वच्छ भारत योजनेला गती देण्याचे काम करत आहेत. मात्र, भिवंडी महापालिकेकडून अशा प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे दिसून येते. म्हणूनच, शहरातही जागोजागी कचऱ्याचे ढीग नजरेस पडतात. यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन साथीच्या आजारांना निमंत्रण मिळते.
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. उलट, अत्यंत बिकट अवस्थेत आहे. केवळ नाइलाजास्तव येथे नागरिक राहत आहेत. झोपड्यांच्या बाजूलाच कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी पालिका स्वच्छता करते की नाही, असा प्रश्न पडतो. स्वच्छतागृहांची दुरवस्था पाहता तेथे जाणेही नकोसे वाटते. यामुळे नागरिक प्रातर्विधीसाठी मोकळ्या जागेत जातात. याचा महिलांना त्रास सहन करावा लागतो. पहाटे किंवा रात्रीच त्यांना जावे लागते. प्रसंगी आडोसा शोधायला लागतो. दुर्गंधी, अस्वच्छता असल्यावर आम्ही कसे जाणार, असा सवाल या झोपडपट्टीवासीयांनी उपस्थित केला. एका बाजूला पालिका गुडमॉर्निंग पथक स्थापन करून नागरिकांना खुल्या जागेत प्रातर्विधीला जाण्यापासून रोखते. गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी करते. पण, त्यापेक्षा स्वच्छतागृहांची दुरवस्था दूर केल्यास आम्ही कशाला उघड्यावर जाऊ. पाण्याची सोय करणे, स्वच्छता ठेवण्याकडे पालिकेने लक्ष दिले पाहिजे, असे येथील महिलांनी सांगितले.
अण्णाभाऊ साठेनगरमध्ये सुमारे ३५०० झोपड्या आहेत. १२ हजार लोकवस्ती आहे. २००० मध्ये नगरपालिकेने १६ सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधली. त्यांची आज दुरवस्था झाली आहे. पालिकेने २००७ मध्ये वाल्मीकी आंबेडकर आवास योजनेमधून ४५०० घरे बांधली. त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने ती मोडकळीस आली आहेत. पाण्याचीही समस्या गंभीर आहे. १५ दिवसांतून पाणी येते. पाण्याच्या टाक्या आहेत, पण वितरणामध्ये दोष असल्याने योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही. पाइपलाइनची ठिकठिकाणी चाळण झाली आहे. त्यामुळे सांडपाणी त्यात शिरत असल्याने नागरिकांच्या नशिबी हे दूषित पाणी वापरण्याशिवाय गत्यंतर नाही. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पालिकेने लाखोंचा विकासनिधी खर्च केला. मात्र, तो येथील नागरिकांपर्यंत पोहोचलाच नाही. तो कुणाच्या खिशात गेला, याची चौकशी झाल्यास सत्य काय ते बाहेर येईल.
शहरात १९७० मध्ये रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्या वेळी ज्यांची घरे तोडण्यात आली, त्या कुटुंबीयांचे पुनर्वसन सरकारने कोबडपाडा-संगमपाडा या ठिकाणी केले. ही झोपडपट्टी कामवारी नदीजवळ असल्याने पावसाळ्यात महापूर आल्यास पावसाचे पाणी झोपड्यांमध्ये शिरून नुकसान होते. या ठिकाणी तालुक्यातील भाजीबाजार भरतो. त्यामुळे अस्वच्छतेचे प्रमाण येथे असते.
नारपोलीमागे अजमेरनगर, कामतघर, वऱ्हाळादेवी तलाव, मानसरोवर येथील फेणेगाव, फेणेपाडा, हनुमानपाडा, फुलेनगर, संगमपाडा, गफूरवस्ती, नदीनाका, म्हाडा कॉलनी, कोबडपाडा या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरी वस्ती आहे.

परप्रांतीयांचा भरणाच अधिक
कामतघर, फेणेगाव, फेणेपाडा येथे वन विभागाच्या जमिनीवर स्थानिक नगरसेवक, बिल्डर, गावगुंड, सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी अतिक्र मणे करून त्या ठिकाणी खोल्या बांधून त्या भाड्याने दिल्या आहेत. काहींनी विकल्या आहेत. या ठिकाणी परप्रांतीयांचा भरणा अधिक आहे. त्याचा उपयोग निवडणुकीत होतो.
त्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट करून लोकप्रतिनिधी निवडून येतात. झोपडपट्ट्यांचा विकास करायचा असल्यास पालिकेने त्यांची तात्पुरती निवासाची सोय करून इमारती त्यांना बांधून सदनिका द्याव्यात.
शहरात आझमीनगर, दर्गा रोड, इदगाह रोड, गायत्रीनगर, नागाव, बारक्या कम्पाउंड, खंडूपाडा, मौलाना आझादनगर, सहयोगनगर, हनुमानटेकडी, ब्रह्मांडनंदनगर, राजू गांधीनगर, हनुमाननगर, गणेशनगर, भय्यासाहेब आंबेडकरनगर या विभागांत झोपड्या असून नागरी सुविधा देण्यात पालिका अपयशी ठरली आहे.



वनजमिनीवर अतिक्र मण करणाऱ्या व झोपड्या विकत घेणाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. योग्य वेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- शिवराम वाळिंबे, वनक्षेत्रपाल, भिवंडी
नागरी सुविधांकडे लक्ष दिले आहे. बहुतांश सोडवल्या आहेत. काही विकासकामे सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण होतील.
-विलास पाटील, गटनेता, कोणार्क विकास आघाडी
येथील नागरिकांच्या समस्या श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याकरिता, मोर्चेही काढले. झोपडपट्टीतील नागरी सुविधा सोडवण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे.
- दत्तात्रेय कोलेकर, जिल्हाध्यक्ष, श्रमजीवी संघटना
येथील वनजमिनीवरील व इतर अतिक्र मणे नियमानुसार करण्यात यावी, यासाठी महासभेत प्रस्ताव मंजूर
करण्यात आला. तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. पाठपुरावा सुरू आहे. शांतीनगर झोपडपट्टी विभागात नागरी सुविधा पुरवण्याकडे आमचा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. - विकास निकम, नगरसेवक
शांतीनगर वॉर्ड क्र मांक ३५ (अ) (ब) या ठिकाणी रस्ते, गटारांची कामे केलेली आहेत. काही कामे मंजूर आहेत, मात्र निधीअभावी झालेली नाहीत. पालिकेने नगरसेवक निधीही दिलेला नाही. मग विकासकामे कशी करायची.
- दिलीप गुळवी, गटनेते, शिवसेना



येथे रस्ते, गटारे, स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. पाणीसमस्या कायमची आहे. स्वच्छता नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधांचा अभाव. आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. कामे झाल्याचे दाखवत अधिकारी, लोकप्रतिनिधींनी भ्रष्टाचार केला आहे.
- शाहूराज साठे, प्रदेश सदस्य,
आरपीआय (आठवले गट)
महिलांना पाणीसमस्या भेडसावत आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. समस्यांकडे लोकप्रतिनिधी, पालिकेने लक्ष द्यावे.
- सीताबाई कसबे,
सामाजिक कार्यकर्त्या
या निवडणुकीत मी प्रथमच मतदान करणार आहे. ज्या उमेदवाराकडे विकासाचे व्हिजन आहे, त्याला पसंती देणार आहे. - सुशील साठे, नवमतदार
अण्णा भाऊ साठे मध्यवर्ती
सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने प्राथमिक सुविधांच्या समस्या सोडवण्यासाठी पालिकेसोबत पत्रव्यवहार सुरू आहे.
नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- मधुकर जगताप, माजी सभापती
झोपडपट्टीधारकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी व प्रशासनाला अपयश आले आहे. विविध योजना राबवल्या, मात्र त्या कागदावरच राहिल्या. आयुक्त, महापौर यांच्याकडे पत्रव्यवहारही केला. महासभेत आवाजही उठवला. प्रशासनाला जाब विचारणार.
- खालीद गुड्डू, विरोधी पक्षनेते

Web Title: Bhiwawa of Clean India Scheme in Bhiwandi City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.