दहीहंडीच्या पंढरीत गोविंदांमध्ये निरुत्साह
By admin | Published: August 17, 2016 02:53 AM2016-08-17T02:53:37+5:302016-08-17T02:53:37+5:30
दहीहंडी जागतिक स्तरावर नेली, ती ठाण्याने. मग, ठाण्यातील आयोजक, त्यांचा इव्हेंट, बक्षिसांपासून ते गोविंदा पथकांचा सहभाग, उत्साह कायम चर्चेचा विषय ठरला आहे
स्नेहा पावसकर , ठाणे
दहीहंडी जागतिक स्तरावर नेली, ती ठाण्याने. मग, ठाण्यातील आयोजक, त्यांचा इव्हेंट, बक्षिसांपासून ते गोविंदा पथकांचा सहभाग, उत्साह कायम चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, यंदा थर आणि बालगोविंदांच्या वयोमर्यादेबाबत लांबलेले निर्णय यामुळे दहीहंडीची पंढरी मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील गोविंदांमध्ये निरुत्साह दिसतो आहे. तर, आठ दिवसांवर दहीहंडीचा उत्सव येऊन ठेपला असतानाही पथकांचा सरावही अभावानेच पाहायला मिळतो आहे.
गुरुपौर्णिमा झाली की, साधारण गोविंदा पथकांचा सराव ठिकठिकाणी सुरू होतो. ठाण्यात साधारण महिला आणि पुरुष दोन्ही मिळून ७० ते ८० गोविंदा पथके आहेत. त्या सर्वांचा सराव तर गुरुपौर्णिमेनंतर जोर धरतो. रात्री ९ नंतर परिसरातील जवळच्या मैदानात सराव रंगतात. मात्र, या वर्षी काही मोजकी गोविंदा पथके सोडली, तर अनेकांनी सरावाला सुरुवातच केलेली नाही. थरांची मर्यादा आणि १२ वर्षांखालील गोविंदांच्या सहभागाबाबत अनेक दिवसांपासून अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे किती वर्षांपासूनच्या गोविंदांना सहभागी होऊ द्यायचे किंवा थरांबाबत कोणत्या आधारावर सराव करावा, असा प्रश्न गोविंदा पथकांसमोर आहे. त्यामुळे अनेकांनी सराव करणेच टाळले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडत असल्याने गोविंदांमध्ये निरुत्साह आहे.