उद्यानातील कामगारांकडून घेतली झाडे कापून
By admin | Published: June 30, 2017 02:43 AM2017-06-30T02:43:52+5:302017-06-30T02:43:52+5:30
पावसाळ््यात झाडे उन्मळून पडतात. वास्तविक ती बाजूला करण्यासाठी किंवा ती छाटण्यासाठी अग्निशमन दलाचा वापर केला पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : पावसाळ््यात झाडे उन्मळून पडतात. वास्तविक ती बाजूला करण्यासाठी किंवा ती छाटण्यासाठी अग्निशमन दलाचा वापर केला पाहिजे. मात्र भिवंडीत उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांकडून ती कापून घेतली जातात. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले नसतानाही त्यांच्याकडून कामे करून घेतली जातात. दोन कामगारांना अंपगत्व आले. यामुळे झाड छाटणीसाठी स्वतंत्र पथक नेमण्याची मागणी केली जात आहे.
मागील रविवारी वऱ्हाळादेवी टाकीजवळ झाड छाटताना पाचशे किलोचा लोखंडी पाईप उद्यान विभागातील कामगारांच्या अंगावर आला होता. प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी झाली नाही. वास्तविक या कामगारांना झाडे छाटण्याचे प्रशिक्षण दिले नसल्याने हा प्रसंग ओढवला. प्रशिक्षण दिले असते तरी कामगारांनी साधनांशिवाय ही कामे केली नसती अशी पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.
कधीकधी नगरसेवक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकून सोसायटीची खाजगी झाडे देखील उद्यान विभागाकडून विनामूल्य काढून घेतात. वास्तविक वीजेच्या तारांमधील झाडे, नैसर्गिक आपत्तीमधील झाडे तोडण्यासाठी लागणाऱ्या शिडीसह, रबरी हातमोजे व इतर वस्तू बहुतांशी अग्निशमन दलाकडे उपलब्ध असतात. अशावेळी अग्निशमन दलास टाळून आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी धोकादायक कामे उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपवतात. त्यामुळे भविष्यात उद्यान विभागातील कामगारांच्या जीवावर बेतल्यास जबाबदार कोण,असा प्रश्न विचारत पालिकेतील एका कामगार संघटनेने अशी कामे उद्यान विभागातील अप्रशिक्षीत कामगारांकडून करून घेऊ नये अशी मागणी केली आहे.
बुधवारी नागाव कादरिया मस्जिदजवळ पावसाने वाकलेले जुने झाड काढण्यासाठी उद्यान विभागास सांगितले. मात्र रहिवाशांचे नुकसान न करता झाड सुरक्षित कापून त्याची विल्हेवाट लावण्याची साधने उद्यान विभागाकडे नसल्याचे उद्यान अधिक्षक एन.एन.संख्ये यांनी सांगितले.