कोरोनाच्या संकट काळात घोडबंदर ग्रामस्थांनी भुकेल्यांसाठी पेटवलेली माणुसकीची चूल अविरतपणे आहे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 02:29 PM2020-04-30T14:29:48+5:302020-04-30T14:30:00+5:30

भाज्या कापण्या पासुन तांदुळ आदी निवडण्याचे व जेवण बनवण्याचे काम महिला करतात.

During the Corona Crisis, the villagers of Ghodbunder continue to burn humanity for the hungry. | कोरोनाच्या संकट काळात घोडबंदर ग्रामस्थांनी भुकेल्यांसाठी पेटवलेली माणुसकीची चूल अविरतपणे आहे सुरु

कोरोनाच्या संकट काळात घोडबंदर ग्रामस्थांनी भुकेल्यांसाठी पेटवलेली माणुसकीची चूल अविरतपणे आहे सुरु

Next

- धीरज परब

मीरारोड - घोडबंदर गावातील ग्रामस्थांनी गेल्या २४ मार्च पासुन गरजु - गरीबांना रोजचे एकवेळचे भरपेट जेवण देण्याचे व्रत चालवले आहे. कोरोनाच्या संकटकाळात गावातील महिला - पुरुष जणु घरचे कार्य आहे या प्रमाणे रोज आवर्जुन सेवेच्या या कर्तव्य यज्ञात सहभागी होत आहेत. रोज ७०० ते ८०० भुकेल्यांच्या पोटातील अग्नी शमवण्यासाठी पेटवलेली अन्नछत्राची चूल अविरतपणे सुरु आहे.

घोडबंदर हे स्थानिक आगरी - कोळ्यांचे गाव. घोडबंदर किल्लया मुळे गावाला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. कोरोनाच्या संसर्गा मुळे जमावबंदी व संचारबंदी लागु झाल्याने अत्यावश्यक गोष्टी वगळता बाकी सर्व ठप्पच आहे. यात मजुरी व रोजचे कमावुन खाणारायांची परिस्थीती खुपच दयनिय झाली आहे. आपल्या भागातील गरजु - गरीब उपाशी राहु नये यासाठी घोडबंदरगावचे ग्रामस्थ आणि माजी उपमहापौर चंद्रकांत वैती व ग्रामस्थांनी तातडीने जेवण बनवुन देण्याचा निर्णय घेतला.

२४ मार्च पासुनच घोडबंदर गावातील बस स्थानका जवळ असलेल्या एका मोकळ्या शेड मध्ये ग्रामस्थांनी अन्नछत्र सुरु केले. रोज घोडबंदर गाव, रेतीबंदर व परिसरातील गरजुंना जेवण दिले जात आहे. सुमारे ७०० ते ८०० लोकं रोज जेवत आहेत. जेवण व पॅकिंगसाठी लागणारे सर्व साहित्य, धान्य आदींचा खर्च ग्रामस्थाच मिळुन उचलत आहेत. गावातुनच कोणी रोख रक्कम देते तर कोणी धान्य , भाज्यांच्या स्वरुपात मदत करत आहे. गावातील आगरी - कोळी महिला स्वत: जेवण बनवत असुन त्यासाठी मसला देखील अस्सल आगरी - कोळी वापरला जात आहे. त्यामुळे या सुग्रणींच्या हातचे जेवण रुचकर असल्याने जेवणारे सुध्दा घरचं जेवण मिळत असल्याचे समाधान व्यक्त करत आहेत. ग्रामस्थांचे हे अविरत सेवाव्रत पाहुन मुस्लिम बांधवांनी सुध्दा १०० किलो तांदुळ दिला आहे.

एमबीए केलेला तरुण हर्षद वैती हा रोज स्वत: जाऊन जेवणा साठी लागणारे धान्य, भाज्या, तेल आदी खरेदी करुन आणतो. सकाळी ९ वाजल्या पासुन गावातील पुरुष भटारखान्याच्या ठिकाणी जमायला लागतात. तर घरची कामं आटोपुन गावातील महिला साडे नऊच्या सुमारास यायला लागतात. काम करण्यासाठी येताना व कामाच्या ठिकाणी सुध्दा मास्क घालण्यासह स्वच्छता व शारिरीक अंतर ठेवले जाते.

भाज्या कापण्या पासुन तांदुळ आदी निवडण्याचे व जेवण बनवण्याचे काम महिला करतात. पुरुष मंडळी सुध्दा महिलांना आवश्यकते नुसार अगदी कांदा कापुन देण्या पासुन मदत करतात. कधी पुरी भाजी, उसळ भात, पुलाव, सांबार भात, मसाले भात, खिचडी असा रोज वेगवेगळा मेनु बनवला जातो जेणे करुन जेवणारायांना सुध्दा एकच पदार्थ खायचा कंटाळा येणार नाही याची काळजी घेतली जाते. जेवण तयार झाले की तर पॅकींग करण्याची जबाबदारी तरुण व पुरुष मंडळी करतात. दुपारी १२ वाजे पर्यंत जेवण तयार होते. उत्साहात व हसत खेळत घरच्या प्रमाणेच जेवण बनवण्याचे काम उरकले जाते. जेवणाची पाकिटं भरली की अवघ्या दिड - दोन तासात ती वाटुन संपतात. गेल्या २४ मार्च पासुन या ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकीने पेटवलेली ही अन्नछत्राची चूल आजही कोणताही खंड न पडता उत्साहात सुरु आहे.

मेघा वैती ( ग्रामस्थ महिला ) - गाव व परिसरात पोटापाण्यासाठी आलेली कुटुंब, मोलमजुरी करणारायांना कोरोनाच्या संकटकाळात आम्ही ग्रामस्थ उपाशी कसे रहायला देऊ ?. ही गरजु लोकं सुध्दा आमच्याच कुटुंबातील आहेत या भावनेने आम्ही ग्रामस्थांनी त्यांच्यासाठी रोज जेवण बनवण्याचे कार्य सुरु केले. गावातील आम्ही महिला घरचे कार्य मानुन मोठ्या आनंदाने रोजचे जेवण बनवत आहोत. कोरोनाच काय कुठल्याही संकटावर आम्ही मात करु अशी जिद्द व आत्मविश्वास यातुन आम्हाला मिळाला आहे.

Web Title: During the Corona Crisis, the villagers of Ghodbunder continue to burn humanity for the hungry.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.