अपहरणाचा गुन्हा दाखल
By Admin | Published: August 29, 2016 04:56 AM2016-08-29T04:56:54+5:302016-08-29T04:56:54+5:30
महापालिकेतील नगररचनाकार संजीव करपे आठ दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा थांगपत्ता अद्याप लागत नसल्याने नातेवाइकांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा खोपोली पोलीस ठाण्यात दाखल झाला
उल्हासनगर : महापालिकेतील नगररचनाकार संजीव करपे आठ दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा थांगपत्ता अद्याप लागत नसल्याने नातेवाइकांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा खोपोली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलीस आणि करपे कुटुंबीय याबाबत काहीही बोलण्यास तयार नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
करपे पुणे येथे शहर विकास आराखड्याच्या बैठकीसाठी निघाले होते. मात्र, लोणावळा येथील बोरघाटात गाडी थांबवून गाडीचालक तिवारीला गाडी घरी घेऊन जाण्यास सांगितले. तसेच मागून मला गाडी घेण्यास येत असल्याचे सांगितले. तेव्हापासून करपे बेपत्ता झाले आहेत. खोपोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल झाला असून त्यांचे मोबाइल रेकॉर्डिंग तपासणे पोलिसांनी सुरू केले आहे. तसेच पालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडून प्राथमिक माहिती घेऊन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी केली आहे.
२० आॅगस्टला बेपत्ता झालेले करपे यांचा आठ दिवसांत थांगपत्ता लागलेला नाही. तसेच कुटुंबाने केलेल्या तपासणीत काहीच हाती लागले नसल्याने कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.
ज्या वाढीव बांधकाम परवान्यांबाबत आमदार ज्योती कलानी यांनी आक्षेप घेऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्या ३९ बांधकाम परवान्यांना नुकत्याच झालेल्या महासभेने स्थगिती दिली आहे. चुकीच्या बांधकाम परवान्यांप्रकरणी राजकीय नेत्यांसह बिल्डर, दलाल आणि पालिका अधिकारी यांनी दबाव टाकल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)