कडाक्याच्या उन्हात ग्रामीण भागात महिलांची वाळवणासाठी लगबग

By Admin | Published: April 11, 2017 02:25 AM2017-04-11T02:25:38+5:302017-04-11T02:25:38+5:30

मार्च ते मे या कडक उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत ग्रामीण भागातील महिलांची वर्षभराच्या वाळवणाची लगबग सुरू झालेली आहे. गावागावांत घरासमोरील अंगणांत एखादी

In the hot sunny days, women are in the rural areas for drying | कडाक्याच्या उन्हात ग्रामीण भागात महिलांची वाळवणासाठी लगबग

कडाक्याच्या उन्हात ग्रामीण भागात महिलांची वाळवणासाठी लगबग

googlenewsNext

- उमेश जाधव,  टिटवाळा

मार्च ते मे या कडक उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत ग्रामीण भागातील महिलांची वर्षभराच्या वाळवणाची लगबग सुरू झालेली आहे. गावागावांत घरासमोरील अंगणांत एखादी रांगोळी काढल्याप्रमाणे वाळवणाचे पदार्थ ठेवलेले आढळतात.
उन्हाळा सुरू झाल्यापासून ग्रामीण भागातील महिलांना वाळवणाचे वेध लागतात. उडीद व मुगाचे पापड, तांदूळ व गव्हाच्या कुरडया, पापड्या, खारवड्या, सांडगे, चिकवड्या, कोंडवड्या, मिरगुंड यांच्या वाळवणाने सारे अंगण भरून गेलेले असते. घरातील कॉट, टेबल, खुर्च्या अंगणांत मांडून त्यावर वाळवणाचे पदार्थ पसरलेले असतात. याचबरोबर वर्षभरासाठी लागणारे मसाले, कडधान्य, लाल मिरच्या, हळकुंड, जिरे, राजिणे, कोकम, चिंच, तांदूळ, फाटी(सरपण)आदी जीवनावश्यक वस्तूंना कडकडीत उन्हं लावून ती कीड लागू नये, याकरिता जपून ठेवली जातात. त्यांची यासाठीधावपळ सुरू आहे. घरासमोरील अंगणात उन्हातान्हाची तमा न बाळगतामहिला, मुली वाळवण घालताना आणि त्याची राखण करताना दिसतात. काही ठिकाणी आजूबाजूच्या दोनचार घरांतील महिला एकत्र येऊन वाळवण करतात. ग्रामीण भागालगत असलेल्या कल्याण, डोंबिवली, ठाणे यासारख्या शहरांत वाळवणाकरिता जागा उपलब्ध नाही आणि महिलांकडे पुरेसा वेळ नाही. त्यामुळे अनेक महिला तयार पापड, कुरडया, तिखट, हळद, कोकम, चिंच बाजारातून विकत आणतात. या शहरांमधील अनेक दुकानांमध्ये हे जिन्नस विक्रीकरिता ठेवले जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील काही महिला हातखर्चाला पैसे हवे म्हणून कुटुंबाच्या गरजेपेक्षा जास्त वाळवण करतात. त्याची स्थानिक व्यापारी, महिला बचत गटांना विक्री करतात. हीच घरगुती उत्पादने आकर्षक पॅकिंगद्वारे शहरांमधील दुकाने, मॉलमध्ये चढ्या किमतीत विकली जातात.
वयोवृद्ध महिलांच्या मार्गदर्शनाखाली वाळवण केले जाते. सुक्या मासळीचे वाळवणही याच काळात सुरू असते. मांदेली, ढोमेली, वाकटी, जवळा, सुकट, बोंबील, माकली अशी विविध प्रकारची सुकी मच्छी कोळीवाडे व अन्य काही भागांत वाळवताना दिसत आहेत. पावसाळ्यात जेव्हा समुद्रातील मासेमारी बंद असते, तेव्हा हीच सुकी मासळी जेवणाची लज्जत वाढवते, असे मत्स्यप्रेमींचे म्हणणे आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागातील शेतीवर पोट असलेली कुटुंबे त्याच कामात गढून जातात. अशावेळी उन्हाळ्यात केलेले वाळवण शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे दोनवेळा पोट भरायला उपयोगी पडते.


सध्या सुरू असलेले वाळवण आम्हाला वर्षभर पुरवावे लागते. पावसाळ्यात याचा खूप वापर होतो. या सर्व खाद्यपदार्थांना व्यवस्थित उन्हं दिली नाही, तर ती खराब होतात. त्यानंतर, त्यांची साठवण हेही तेवढेच जोखमीचे काम असते.
-कुसुम जाधव व ऊर्मिला जाधव, गृहिणी, फळेगाव

Web Title: In the hot sunny days, women are in the rural areas for drying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.