भुकेल्यांना मुंब्य्रात मिळते ५ रुपयात जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:03+5:302021-04-04T04:42:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्राः कुणीही उपाशी राहू नये, या उद्देशाने उम्मीद फाउंडेशनने सुरू केलेल्या उम्मीद फूड हाऊसमध्ये दररोज ४५० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्राः कुणीही उपाशी राहू नये, या उद्देशाने उम्मीद फाउंडेशनने सुरू केलेल्या उम्मीद फूड हाऊसमध्ये दररोज ४५० ते ५०० जणांना फक्त पाच रुपयांमध्ये भरपेट जेवण देण्यात येत आहे. यामुळे अल्पउत्पन असलेल्या तसेच बेरोजगार असलेल्यांची अल्प पैशात क्षुधाशांती होत आहे.
गेल्यावर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ठिकठिकाणी सामाजिक संस्था तसेच काही राजकीय पक्षांनी कम्युनिटी किचन सुरू केले होते. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर त्यातील बहुतांशी बंद झाले; परंतु कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या तसेच बेरोजगार झालेल्या हजारोजणांसमोर पोटाची खळगी कशी भरायची, असा यक्षप्रश्न समोर ठाकला होता. त्यामुळे ते सैरभैर होऊन ठिकठिकाणी अन्नाच्या शोधात फिरत असल्याचे उम्मीदचे अध्यक्ष परवेझ फरीद यांच्या निर्दशनास आले. अशा सैरभैर भटकट असलेल्यांसाठी अल्प पैशात किमान एकवेळचे जेवण मिळावे यासाठी परवेझ यांनी सुरू केलेला हा उपक्रम मागील सात महिन्यांपासून अखंडपणे सुरू आहे. सध्या रशीद कम्पाउंड भागातील चर्णीपाडा येथून कार्यान्वित होत असलेला हा उपक्रम पहिले पाच महिने अमृतनगर येथून सुरू होता. सध्या या उपक्रमाअंतर्गत पाच रुपयांमध्ये साधारणत: दोन ते तीनजणांना पुरेल एवढ्या अन्नाचे वाटप संध्याकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ वाजण्यादरम्यान करण्यात येते. यामध्ये दरदिवशी मेनू बदली केला जातो. मेनूमध्ये भात, डाळ किंवा भाजी, बिर्याणी, पुलाव आदींचा समावेश असतो. जेवण घेण्यासाठी घरून डबा आणावा लागतो. ते घेण्याकरिता येणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या श्रेणीअंतर्गत वेगवेगळ्या रंगाचे कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सर्वसामान्यांना हिरव्या रंगाचे, विधवा महिलांना गुलाबी रंगाचे तसेच दिव्यांग आणि वृद्धांना निळ्या रंगाचे कार्ड देण्यात आले आहे. या उपक्रमासाठी अनेक सामाजिक संस्था मदत करत असल्याची माहिती परवेझ यांनी ‘लोकमत’ला दिली.