पुरेशी लस आली नाही, तर तिसरी लाट रोखणार कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:15+5:302021-07-12T04:25:15+5:30
कल्याण : केंद्र सरकारकडून लोकसंख्येच्या आधारे कोरोना लसीचे डोस राज्याला आणि विविध महापालिकांना पुरविले जात आहेत. मात्र, लसीचे डोस ...
कल्याण : केंद्र सरकारकडून लोकसंख्येच्या आधारे कोरोना लसीचे डोस राज्याला आणि विविध महापालिकांना पुरविले जात आहेत. मात्र, लसीचे डोस पुरेसे येत नसल्याने कोरोनाची तिसरी लाट रोखायची कशी, असा सवाल कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. केंद्राकडून राज्य आणि महापालिकांना जास्तीत जास्त लसीचे डोस उपलब्ध व्हावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
डोंबिवलीतील महावीर सोसायटीत कचऱ्यापासून खत तयार करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी वरील सवाल केला. ते म्हणाले, लोकसंख्येच्या आधारे लसीचे डोस उपलब्ध करून दिले जातात; परंतु केडीएमसीची लोकसंख्या जास्त आहे. राज्यातील मुंबई एमएमआर क्षेत्र ही सर्वांत मोठी नागरी वसाहत आहे. त्याची लोकसंख्या पाहता एमएमआर रिजनसह राज्याला जास्तीत जास्त लसीचे डोस केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजेत.
ते पुढे म्हणाले, ‘केंद्र सरकारकडून सुरुवातीला लसीचे डोस पुरविले जात होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात लसीकरण सातत्याने बंद ठेवण्याची वेळ विविध महापालिकांवर येत आहे. त्यात कल्याण-डोंबिवली मनपातील लसीकरण पाच ते सात दिवस बंद होते. तिसऱ्या लाटेची शक्यता असताना लसीचे डोस पुरेसे उपलब्ध झाले नाहीत. असे असताना तिसरी लाट रोखणार कशी? असा प्रश्न आहे. केंद्राने मुबलक प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करून दिल्यास जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. हा विषय केंद्र सरकारने गांभीर्याने घेतला पाहिजे.’
-----------------