लोकसंख्येच्या घनतेपुढे शहरांतील पायाभूत सुविधा पडताहेत अपुऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 10:43 AM2021-07-11T10:43:15+5:302021-07-11T10:46:52+5:30

मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महानगरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र शासनाच्या मिलिनियम प्लस शहरांच्या यादीतही या प्रदेशातील सर्वाधिक शहरे आहेत.

Inadequate infrastructure in cities is facing population density | लोकसंख्येच्या घनतेपुढे शहरांतील पायाभूत सुविधा पडताहेत अपुऱ्या

लोकसंख्येच्या घनतेपुढे शहरांतील पायाभूत सुविधा पडताहेत अपुऱ्या

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महानगरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.केंद्र शासनाच्या मिलिनियम प्लस शहरांच्या यादीतही या प्रदेशातील सर्वाधिक शहरे आहेत.

नारायण जाधव

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महानगरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र शासनाच्या मिलिनियम प्लस शहरांच्या यादीतही या प्रदेशातील सर्वाधिक शहरे आहेत. या योजनेंतर्गत केंद्र सरकारने येथील महानगरांतील प्रदूषण,  पाणीपुरवठा यासह इतर मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधींची अनुदाने देऊ केली आहेत. मात्र, लोकसंख्येच्या वाढत्या घनतेपुढे महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमध्ये वॉटर, मीटर, गटरच नव्हे सर्वच सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. सार्वजनिक बससेवा, लोकल सेवेसह आता मेट्रो १२ मार्गही आकार घेत आहेत. मात्र, तरीही वाढते उद्योग, आयटी पार्क, व्यापार-उदीमामुळे प्रवाशांची गैरसोय कमी झालेली नाही.

राज्याची राजधानी मुंबईचा जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या महानगरांत समावेश झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र, मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात लघु उद्योगांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर शहराची घनता २०११च्या जनगणणेनुसार मुंबई शहारापेक्षा तब्बल दहा हजाराहून अधिक तर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ठाणे शहरापेक्षा तब्बल २४ हजाराहून अधिक आहे. मुंबईची लोकसंख्या घनता प्रति चौरस किलोमीटरला २८ हजार ४२६ आहे. तर उल्हासनगरची सुमारे ३८ हजार ९३१ इतकी प्रचंड आहे. तर ठाणे शहराची लोकसंख्या घनता १४ हजार ३६१ इतकी आहे. ठाणे शहराहून अधिक लोकसंख्येची घनता उल्हासनगर पाठोपाठ भिवंडी २६ हजार ८७१ आणि कल्याण-डोंबिवली २२ हजार २१८ यांची आहे. एमएमआरडीएनेच आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. उल्हासनगरचे भौगोलिक क्षेत्रफळ अवघे १३ चौरस किलोमीटर असल्याने त्यांची लोकसंख्या घनता देशात कदाचित सर्वाधिक असावी.

देशातील सर्वाधिक लोकसंख्या आणि महापालिका असलेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. २०११च्या जनगणणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी १० लाख सहा हजार १४८ इतकी आहे. जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी अशा सहा महापालिका आहेत. तर वसई-विरार नव्या पालघर जिल्ह्यात गेले आहे. राजधानी मुंबईत लोकसंख्येच्या वृद्धीचा स्थिर असला तरी २००१-२०११च्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या अडीच लाखांहून कमी झालेली आहे. ती नजीकच्या ठाणे जिल्ह्यात मात्र वाढली आहे. यात ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि वसईचा वेग झपाट्याने वाढत आहे. पाठोपाठ अंबरनाथ-बदलापूर, उरण-पनवेलची लोकसंख्याही वेगाने वाढत आहे.

मुंबई महानगर प्रदेशाच्या शहरी विभागाची लोकसंख्येची घनता ही एकूण लोकसंख्येच्या तिप्पट आहे. महानगर प्रदेशांतील ८६.२६ टक्के लोकसंख्या महापालिका क्षेत्रांतील आहे. त्यात मुंबईचा वाटा ५४.५६ तर इतर सात महापालिकांचा वाटा ३२.०७ टक्के आहे. या सातपैकी ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या चार महानगरपालिका दहा लाखांहून लोकसंख्येच्या होत्या. इतर तीन महापालिकाही दहा लाखांच्या होतील, असा अंदाज होता, आता २०२१ मध्ये  तो खरा झालेला असेल.

वाढत्या लोकसंख्येपुढे पाणीटंचाईचे संकट
महानगर प्रदेशातील शहरी भागातच आजघडीला पाण्याचा सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतका प्रचंड तुटवडा आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. २०११ ते आता २०२१ पर्यंत लोकसंख्या प्रचंड वाढली असून आताच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मात्र, त्याचा विचार न करता महाविकास आघाडी सरकारने क्लस्टर आणि एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीच्या नावाखाली चटईक्षेत्रात खैरात वाटून भविष्यातील संकटात आणखी भर घातली आहे.

Web Title: Inadequate infrastructure in cities is facing population density

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.