पोटनिवडणुकीमुळे अंतर्गत गटबाजी
By admin | Published: August 20, 2016 04:49 AM2016-08-20T04:49:42+5:302016-08-20T04:49:42+5:30
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आणखी काही महिने शिल्लक असतानाच आता दोन प्रभागातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अंतर्गत गटबाजीचे राजकारण
ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आणखी काही महिने शिल्लक असतानाच आता दोन प्रभागातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अंतर्गत गटबाजीचे राजकारण पुन्हा एकदा समोर आले आहे. रिपाइं आठवले गटाचे शहर अध्यक्षाने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला असतांनाच त्यांच्या निरीक्षकांनी मात्र तो भाजपाला दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या निमित्ताने रिपाइंमध्ये दोन गट पडले असून शिवसेना आणि भाजपाला याचा कितपत फायदा होणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने पुन्हा शिवसेनेवर तोंडसुख घेतले आहे. शिवसेनेनेच दिलेला शब्द न पाळल्याने,आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे.
प्रभाग क्र. ३२ अ आणि ५३ अ मध्ये सध्या पोटनिवडणूक लागली असून या दोन्ही निवडणुका आता शिवसेना आणि भाजपाने चांगल्याच मनावर घेतल्या आहेत. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत ठरल्याप्रमाणे विटाव्याची जागा ही भाजपाच्या वाटेला जाणे अपेक्षित होते. त्यानुसार ती जागा शिवसेनेकडे मागितली होती, अशी माहिती भाजपाचे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी दिली. परंतु, शिवसेनेने पुन्हा या ठिकाणी एका हत्येप्रकरणातील आरोपी असलेल्या माजी नगरसेवकाच्याच घरातील नातेवाईकाला तिकीट दिल्याने आम्ही त्याठिकाणी उमेदवार दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने रिपाइं आठवले गटाने या निवडणुकीसाठी भाजपाला जाहीर पाठिंबा दर्शविल्याचे जाहीर केले. तो देतांनाच जर कोणी वैयक्तीक पाठिंबा इतर ती त्याची एकट्याची भूमिका असेल असा अप्रत्यक्ष टोला पक्षाचे ठाणे शहर जिल्हा निरिक्षक प्रा. एकनाथ जाधव यांनी शहर अध्यक्ष रामभाऊ तायडे यांना लगावला. किंबहुना या संदर्भात त्यांना छेडले असता, त्यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपा हे आमने सामने आले असले तरी दुसरीकडे रिपाइंच्यामध्येही दोन पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी ठामपा निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, त्यांच्यावर यापूर्वीच पक्षाने कारवाई करुन त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांनी जे लेटरहेड वापरलेले आहे, तेदेखील बोगस आहे.
- रामभाऊ तायडे,
रिपाइं आठवले गट,
ठाणे शहर अध्यक्ष.