पोलीस अधीक्षकांचीच जनता दरबाराला दांडी!
By admin | Published: August 12, 2016 01:28 AM2016-08-12T01:28:10+5:302016-08-12T01:28:10+5:30
पोलिसांविरोधात असलेला रोष वसईत गुरूवारी झालेल्या जनता दरबारात प्रकट झाला खरा परंतु नागिरकांनी केलेल्या अनेक तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
वसई : पोलिसांविरोधात असलेला रोष वसईत गुरूवारी झालेल्या जनता दरबारात प्रकट झाला खरा परंतु नागिरकांनी केलेल्या अनेक तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अनेक तक्रारीत गुन्हे दाखल होते तर काही तक्रारी अदखलपात्र होत्या असे पोलिसांनी स्पष्ट केले. वसईतल्या नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी वसई जनआंदोलन समितीच्या पुढाकाराने हा जनता दरबार आयोजित क़रण्यात आला होता. मात्र, आधी वेळ देऊनही पोलीस अधिक्षक जनता दरबारात आल्या नाहीत. तर अपर पोलीस अधिक्षकही बैठकीसाठी निघून गेल्याने पोलीस उपअधिक्षकांनी तक्रारी ऐकून त्यांचा निपटारा केल्याने प्रारंभी संतापलेले जनआंदोलनाचे र्काकर्ते नंतर शांत झाले.
वसई विरार मधल्या पोलीस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारी पोलीस नोंदवून घेत नाहीत असा आरोप जनआंदोलन समितीने केला होता. त्यासाठी नागरिकांचा हेल्प डेस्क स्थापन क़रण्यात आला होता. ज्या नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. तसेच पंधरा आॅगस्ट नंतर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे पालघरच्या पोलीस अधिक्षकांनी गुरूवारी वसईत जनता दरबाराचे आयोजन केले होते. मात्र पोलीस अधिक्षिका शारदा राऊत या दरबारात उपस्थित राहू शकल्या नाहीत. तसेच अपर पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांच्या कार्यालयातच हा जनता दरबार असतांनाही ते ही पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले होते. त्यामुळे जनआंदोलनाचे कार्यकर्ते संतापले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विभागीय पोलीस उपअधिक्षक अनिल आकडे यांनी हा दरबार घेतला.
त्यात ४१ तक्रारी करण्यात आल्या. त्यात फसवणूक, घोटाळे, महिला अत्याचार आदींचा समावेश होता. सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्यासाठी बोलावून घेण्यात आले होते. आमच्याकडे आलेल्या तक्रारदारांचे आम्ही निरसन केले आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्याबाबात सूचना दिल्या. अनेक तक्रारींमध्ये यापूर्वीच गुन्हे दाखल होते असे उपअधिक्षक अनिल आकडे यांनी सांगितले. बलात्कारा प्रकरणी गुन्हा दाखल करत नाही अशी तक्रार होती पण त्याही प्रकरणात आरोपीला अटक केली होती असे ते म्हणले. काही तक्रारींमध्ये तथ्य नव्हते. अनेक तक्रारी या दिवाणी स्वरूपाच्या होत्या. काही तक्रारी पालिकेविरोधातील होत्या अशीही माहिती त्यांनी दिली. प्रत्येक नागरिकांच्या तकारी नोंदवून घ्याव्यात तसेच पिडितांना ताटकाळत ठेवू नये अशा सूचना उपअधिक्षकांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना दिल्या. तक्रारदारांचे समाधान झाले नाही तर थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)