शहाडमध्ये मुख्य जलवाहिनी फुटली; ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 12:36 PM2021-01-02T12:36:03+5:302021-01-02T12:40:03+5:30

Water Supply : दुरुस्तीसाठी १२ ते १४ तासांचा कालावधी जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली.

The main aqueduct burst in Shahad; Water supply in Thane, Mira Bhayander and Bhiwandi was affected | शहाडमध्ये मुख्य जलवाहिनी फुटली; ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला परिणाम

शहाडमध्ये मुख्य जलवाहिनी फुटली; ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला परिणाम

Next

ठाणे  - ठाणे  शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा करणारी स्टेमची मुख्य जलवाहिनी शहाड मुख्य हेडक्वॉटर जवळ फुटल्याची घटना सकाळी घडली आहे. रात्री वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर सकाळी ही जलवाहिनी फुटली आहे. ही जलवाहिनी नदीपात्राच्या भुमिगत असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी १२ ते १४ तासांचा कालावधी जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली. १८५० डायमीटरच्या या जलवाहीनातून ठाण्याला ११६ दशलक्ष पाणी पुरवठा रोज होत आहे. त्यामुळे संपूर्ण ठाण्याला आणि मीरा भाईंदर, भिवंडी शहरावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

शहाड येथील हेडक्वॉटर जवळ असलेल्या स्टेमच्या जलवाहिनीचा वीज पुरवठा रात्री खंडीत झाला होता. त्यानंतर सकाळी ती एका ठिकाणी लिकेज झाली, तर अन्य एका ठिकाणी जलवाहिनी फुटली. मागील सहा तासांत ३ वेळा वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्याचा परिणाम या जुन्या आणि जीर्ण झालेल्या जलवाहीनीवर झाल्याचे दिसून आले. १८५० डायमीटरची ही जलवाहिनी भुमिगत असल्याने आणि ती ज्या ठिकाणी फुटली आहे, ती जागा नदीजवळ खाली असल्याने दुरुस्तीसाठी स्टेम प्राधिकरणाला १२ ते १४ तासांचा कालावधी जाणार असल्याचे सांगण्यात आले. तर ही जलवाहिनी ३० वर्षे जुनी असल्याने ती जीर्ण देखील झालेली आहे. दरम्यान या संदर्भात पालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याशी संर्पक साधला असता, त्यांनी सांगितले की, रात्री १२ नंतरच ही जलवाहिनी दुरुस्ती होऊ शकणार आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणो शहराच्या पाणी पुरवठय़ावर याचा परिणाम होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.

ठाणे शहराला या जलवाहिनीतून ११६ दशलक्ष लीटर रोज पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला पाणी कपातीच्या झळा बसण्याची शक्यता आहे. परंतु महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून २१० दशलक्ष लीटर पाण्याचे झोन वाईज नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार घोडबंदरचा पाणी पुरवठा चार तास बंद ठेवला जाणार आहे. त्यानंतर ठाणे  शहराचा चार तास त्यानंतर उर्वरीत भागाचा चार तास पाणी पुरवठा बंद ठेवून कोणत्याही भागाला पाण्यापासून वंचित न ठेवता कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली. परंतु ठाणेकरांनी पाण्याचा अतिवापर न करता जोपर्यंच जलवाहीनी दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

स्टेमच्या या जलवाहिनीच्या माध्यमातून ठाण्यासह मिरा भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिका आणि भिवंडी ग्रामीण भागालाही पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे या भागांचाही पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. ठाण्याला स्वत:ची पाणी पुरवठा योजना असल्याने त्याचा जास्तीचा परिणाम ठाणो शहरावर होणार नसला तरी मिरा भाईंदर आणि भिवंडीला पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: The main aqueduct burst in Shahad; Water supply in Thane, Mira Bhayander and Bhiwandi was affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.