मीरा-भाईंदर महापालिकेच्या मंडईमधून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 03:50 PM2018-12-30T15:50:31+5:302018-12-30T16:12:46+5:30

भाईंदरच्या मीनाताई ठाकरे मंडईमधील रविवार आठवडे बाजारातून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार मीरा भाईंदरमध्ये घडला आहे.

mira bhayander market nashik farmers | मीरा-भाईंदर महापालिकेच्या मंडईमधून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावले

मीरा-भाईंदर महापालिकेच्या मंडईमधून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावले

googlenewsNext
ठळक मुद्देभाईंदरच्या मीनाताई ठाकरे मंडईमधील रविवार आठवडे भाईंदरच्या मीनाताई ठाकरे मंडईमधील रविवार आठवडे बाजारातून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार मीरा भाईंदरमध्ये घडबाजारातून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार मीरा भाईंदरमध्ये घडला आहे.भर थंडीत कुडकुडत रस्त्यावर रहावे लागलेल्या शेतकऱ्यांना सकाळी आपला बाजार सुद्धा रस्त्यावरच मांडावा लागला.शेतकऱ्यांवर सत्ताधारी भाजपाने चालवलेला हा अन्याय खपवुन घेणार नाही असा इशारा सेना व मनसेने दिला.

मीरारोड - भाईंदरच्या मीनाताई ठाकरे मंडईमधील रविवार आठवडे बाजारातून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार मीरा भाईंदरमध्ये घडला आहे. हॉलमध्ये मंडप-डेकोरेशनचे काम घेणाऱ्या भाजपा नगरसेवकाच्या सांगण्यावरुन मंडईच्या दारास टाळे ठोकल्याचा आरोप आहे. रात्री दीड वाजल्यापासून भर थंडीत कुडकुडत रस्त्यावर रहावे लागलेल्या शेतकऱ्यांना सकाळी आपला बाजार सुद्धा रस्त्यावरच मांडावा लागला.

राज्यशासनाने शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळावा, अडत्यांचा कात्रीतून सुटका होऊन त्यांना थेट बाजारपेठेत फळ-भाजीपाला विकता यावा तसेच नागरीकांना सुध्दा याचा फायदा व्हावा म्हणून संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजार भरवण्याची योजना अमलात आणली. राज्याच्या कृषी पणन महामंडळाने देखील त्यासाठी पालिकेला कळवले. महापौर गीता जैन यांच्या आग्रही मागणीनंतर पालिकेने भाईंदर पश्चिम येथील अमृतवाणी मार्गावर असलेले मार्केटचे आरक्षण क्र. ९७ व इंद्रलोक भागातील मीनाताई ठाकरे मंडई आरक्षण क्रमांक २३१ मधील जागा शेतकऱ्यांच्या आठवडे बाजारसाठी उपल्बध करुन दिली. तसे पत्र पालिकेने पणन मंडळास दिले.

मंडईच्या आवारात दर रविवारी गेल्या 13 महिन्यांपासून शेतकरी आठवडा बाजार भरत आहे. नाशिकववरुन येणारे ३० ते ३५ शेतकरी हे आपला भाजीपाला आदी येथे विक्रीसाठी टेम्पोने घेऊन येतात. यात काही महिला शेतकरयांचा सुध्दा समावेश आहे. थेट ग्राहकांना भाजीपाला विकल्याने शेतकऱ्यांना भाव मिळतो. शिवाय ग्राहकांना थेट शेतातील भाजीपाला माफक दरात मिळत असल्याने सदर आठवडे बाजार लोकांच्या पसंतीस उतरला आहे.

दरम्यान ठाकरे मंडईमध्ये पालिकेने खाली मंडई व वरती हॉल असे बांधकाम केले असुन त्याचे उद्घाटन खुद्द मुख्यमंत्र्यांनी होळीच्या वेळी केले होते. आता पालिकेने सदरचा हॉल हा गोल्डन पेटल नावाच्या कंत्राटदारास भाड्याने दिला आहे. गोल्डन पेटलचे नाव असले तरी या मागे भाजपा नगरसेवक राकेश शाह हे आहेत व शाह यांनी मंडईच्या आवारात भरणारा आठवडे बाजार बंद करण्यास शेतकऱ्यांना सांगितले असा आरोप केला जात आहे. त्यामुळे रविवारी पहाटे दीडच्या सुमारास नाशिकवरुन सदर शेतकरी भाजीपाला घेऊन आले असता मंडईचे प्रवेशद्वार त्यांच्यासाठी बंद करण्यात आले. शाह यांनी तुम्हाला आत घ्यायचे नाही असे सांगितले असून तुमची व्यवस्था तुम्ही करा असे शेतकऱ्यांना रखवालदारामार्फत बजावण्यात आले.

मंडईचे प्रवेशद्वारच बंद केल्याने नाईलाजाने पुरुष व महिला शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत उघड्यावरच कुडकुडत रात्र काढावी लागली. सकाळी त्यांना मंडईच्या बाहेरील रस्त्यावर नाईलाजाने भाजीपाला विक्रीस मांडावा लागला. नाशिकवरुन भाजीपाला विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागल्याचे कळताच माजी महापौर गीता जैन, शिवसेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, प्रवक्ते शैलेष पांडे, मनसेचे शहरअध्यक्ष प्रसाद सुर्वे, भाईंदर अध्यक्ष हेमंत सावंत आदींनी मंडईकडे धाव घेत शेतकऱ्यांकडून घडल्या प्रकाराची माहिती घेतली.

शेतकऱ्यांवर सत्ताधारी भाजपाने चालवलेला हा अन्याय खपवुन घेणार नाही असा इशारा सेना व मनसेने दिला. पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याकडे तक्रार केल्यावर मंडईचे प्रवेशद्वार खुले केले गेले. परंतु आधीच रस्त्यावर बाजार सुरु केल्याने शेतकरी आत गेले नाहीत. 

राजेश बाळासाहेब आव्हाड (शेतकरी) - रात्री एकच्या सुमारास नाशिकवरुन आलो असता मंडईचे आता गाडी नेण्यास सक्त मनाई केली. या पुढे गाडी आत लावायची नाही, तुमचे तुम्ही बघा असे सांगण्यात आले. आणलेला भाजीपाला परत कसा न्यायचा ? नुकसान होईल म्हणुन नाईलाजाने रस्त्यावरच थांबलो व सकाळी भाजीपाला विक्रीसाठी ठेवला.

राकेश शाह ( भाजपा नगरसेवक ) - मी ठाकरे हॉल भाड्याने घेतला नसुन या प्रकाराशी माझा काहीच संबंध नाही. माझा आधीपासून मंडप - डेकोरेटरचा व्यवसाय असून या हॉलमध्ये ठेकेदाराच्या आॅर्डर वरुन माझे केवळ मंडप - डेकोरेटरचे काम चालते.

शैलेष पांडे ( प्रवक्ता , शिवसेना ) - पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, पीकविम्यात घोटाळा आदींमुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. त्यातच आता पालिकेतील सत्ताधारी भाजपाने शेतकऱ्यांचे कडाक्याच्या थंडीत अमानवी हाल करत मंडईतून हुसकावून लावणे निंदनीय आहे.

प्रसाद सुर्वे ( मनसे शहरअध्यक्ष ) - शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या भाजपाची मस्ती मनसे उतरवल्या शिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या जागा लाटणाऱ्या शहरातील भाजपा नेत्यांना शेतकरी नको आहेत. त्यांना त्यांचा धंदा व उद्योगपती हवे आहेत. बेकायदा फेरीवाल्यांना आश्रय देता. आठवडे बाजार बंद केला तर आंदोलन करू.

गीता जैन ( माजी महापौर, भाजपा ) - शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आठवडे बाजारास पालिकेने जागा द्यावी म्हणुन आपण प्रयत्न केले होते. त्यांना हुसकावून लावणे म्हणजे समस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे. भाजीपाला मंडईमध्ये विकायचा नाही तर कुठे विकायचा ?

Web Title: mira bhayander market nashik farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.