Raj Thackeray: “शरद पवार नास्तिक, देव मानत नाहीत, देवळात हात जोडतानाचा फोटो सापडणार नाही”: राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 09:17 PM2022-04-12T21:17:19+5:302022-04-12T21:18:14+5:30

Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसणार नाहीत. कारण...

mns raj thackeray criticized ncp and sharad pawar over various issues in thane uttar sabha | Raj Thackeray: “शरद पवार नास्तिक, देव मानत नाहीत, देवळात हात जोडतानाचा फोटो सापडणार नाही”: राज ठाकरे

Raj Thackeray: “शरद पवार नास्तिक, देव मानत नाहीत, देवळात हात जोडतानाचा फोटो सापडणार नाही”: राज ठाकरे

Next

ठाणे: राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आपल्या भाषणात नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याचे सांगत असतात. ते कुणीही नाकारू शकत नाही. परंतु, शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसत नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या आधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. शरद पवार नास्तिक, देव मानत नाहीत, देवळात हात जोडतानाचा फोटो सापडणार नाही, या शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. 

ठाण्यात राज ठाकरे यांची उत्तरसभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. मशिदींवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील. तो मुद्दा सोडणार नाही. सरकारने काय हवे ते करावे, असे आव्हानच राज ठाकरे यांनी यावेळी दिले. तसेच ३ मेपर्यंत भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम सरकारला दिला असून, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार, असा एल्गार राज ठाकरे यांनी यावेळी केला. आत्ता हनुमान चालिसा सांगतोय, माझ्या भात्यातील पुढचा बाण काढायला लावू नका, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला. 

शरद पवारांवर साधला जोरदार निशाणा

शरद पवार यांच्याकडे घेण्यासारखे अनेक गुण आहेत. मात्र, स्वार्थी राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीयद्वेष महाराष्ट्रात पसरला, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. प्रत्येक जातीचा माणूस शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी लढला. शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचणे महत्त्वाचे आहे. मात्र, तो कुणी लिहिला, यावरून राजकारण केले गेले. जाती-पातीत महाराष्ट्र अडकला गेला. महाराष्ट्राला कुणीही हरवू शकत नाही, मात्र राज्यातील जातीचे राजकारणच आपल्याला हरवेल, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच अनेक संघटना स्थापन झाल्या.  महाराष्ट्रात जाती होत्याच पण राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद महाराष्ट्रात आला. जातीयद्वेष पसरला, असा मोठा आरोप राज ठाकरे यांनी केला. 

शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसणार नाहीत

शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसणार नाहीत. छत्रपतींचे नाव घेतल्यावर मुस्लीम मते जातील ही शरद पवारांना भीती आहे, असा दावा करताना अफझल खान वीणा वर्ल्डचे तिकीट काढून महाराष्ट्र दर्शनाला आला होता का, अशी खोचक विचारणा राज ठाकरे यांनी केली. शरद पवारांनी आपल्या पद्धतीने राजकारण केले. बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले हे कुणीही अमान्य करणार नाही. शिवाजी महाराजांवर अनेकांनी लिहिले आहे, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले. 
 

Web Title: mns raj thackeray criticized ncp and sharad pawar over various issues in thane uttar sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.