ब्राह्मणांच्या एकत्रीकरणासाठी डोंबिवलीमध्ये चळवळ

By admin | Published: October 3, 2016 03:33 AM2016-10-03T03:33:48+5:302016-10-03T03:33:48+5:30

मुस्लीम समाज सच्चर आयोगाच्या अंमलबजावणीकरिता रस्त्यावर उतरण्याच्या विचारात आहे.

Movement of Dombivali movement for Brahmins | ब्राह्मणांच्या एकत्रीकरणासाठी डोंबिवलीमध्ये चळवळ

ब्राह्मणांच्या एकत्रीकरणासाठी डोंबिवलीमध्ये चळवळ

Next


ठाणे : मराठा समाज त्यांच्या मागण्यांकरिता लाखोंचे मोर्चे काढत आहेत, मुस्लीम समाज सच्चर आयोगाच्या अंमलबजावणीकरिता रस्त्यावर उतरण्याच्या विचारात आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या रक्षणाकरिता लातूरमध्ये पँथर्सनी मोर्चा काढला आणि ओबीसींनी नाशिकमध्ये मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील ब्राह्मण समाजाच्या एकत्रिकरणाच्या हालचालींना जोरदार वेग आला आहे. ‘ब्राह्मण युनिटी ग्रुप’च्या झेंड्याखाली नवरात्रोत्सवानंतर एकत्र येण्याचे नक्की झाले आहे.
ब्राह्मणांना आर्थिक निकषावरही आरक्षण नको की सरकारकडून कोणताही वेगळे लाभ नको. मात्र, यापुढे समाजातील सर्व पोटजाती, शाखा, उपशाखा यांनी आपापसातील भेदाभेद विसरून केवळ ब्राह्मण समाजाच्या उद्धारासाठी एकत्र येण्याची ही मोहीम असणार आहे.
पेशव्यांनंतर ब्राह्मण समाजातील कोणीही सत्ताधारी झाला नाही. त्याला मनोहर जोशी आणि आताचे देवेंद्र फडणवीस हेच दोघे अपवाद आहेत. ब्राह्मण म्हणून त्यांना कोणीही मुख्यमंत्री केलेले नाही. त्यांची पक्षनिष्ठा, हुशारी आदी गुण पाहून त्यांची नियुक्ती झाली आहे, असे ब्राह्मण युनिटी ग्रुपमधील अनेकांचे मत आहे.
ब्राह्मण युनिटी ग्रुपतर्फे होणाऱ्या बैठकीत ब्राह्मण युनिटीची बँक स्थापन करून गावोगावी शाखा उघडणे, त्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील होतकरु तरुणांना शिक्षणाकरिता किंवा व्यवसायाकरिता कर्ज देणे, जगभरातील ब्राह्मण व्यापारी, उद्योजक यांचे एकत्रिकरण करून त्यांना याच बँकांत ठेवी ठेवण्यास व व्यवहार करण्यास बाध्य करणे, ब्राह्मण युनिटी दुकाने उघडून समाजातील तरुण व्यापाराकडे वळेल याकरिता प्रयत्न करणे, मागेल त्याला त्याच्या क्षमतेनुसार नोकरी व व्यवसाय देणे आदी विषयांवर चर्चा केली जाणार त्यासाठी आॅनलाईन नोंदणीही सुरू झाली आहे.
डोंबिवलीतील ल. कृ. पारेकर गुरुजी म्हाणाले, ब्राह्मण समाजाला एकत्र आणण्याचे काम आजवर सुरूच होते. शहरात विविध संघटना, संस्था त्यांच्या पद्धतीने काम करीत आहेत. शार्मिष्ठा जहागीरदार यांनी ‘ब्राह्मण मंच डोंबिवली’हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप स्थापन केला. अशा आणखी ग्रुपची भर पडली. अनेक ग्रुपपेक्षा समाजाला जोडणारा एकच ग्रुप असावा. डोंबिवलीत दीड लाखांच्या आसपास ब्राह्मण राहतात. एवढ्या मोठ्या संख्येने ब्राह्मण एकाच शहरात वास्तव्य करीत असल्याचे दुसरे ठिकाण नाही. त्यामुळे डोंबिवलीत एकत्रिकरणाच्या कल्पनेला सर्वप्रथम अंकुर फुटला आहे. सिडकोच्या अध्यक्षपदी नारायण मराठे होते. मात्र, त्यांनी कधी कोणत्या ब्राह्मण समाजाला कधीही भूखंडांचे वाटप केले नाही. वेदपाठ शाळेला कधीही सरकारकडून अनुदान मिळत नाही.
>समाजबांधवांच्या भल्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सर्व समाजांना आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, आरक्षणाची ब्राह्मणांना गरज नसली तरी कोणत्या मुद्द्यांवर एकत्र यायचे, आपण समाजासाठी काय करू शकतो, आपण आहोत त्या क्षेत्रात आपल्या होतकरू समाज बांधवांना कशी मदत करावी यासाठी सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याचे समजते.
ब्राह्मणांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये कधीही संप झाले नाहीत. अनेकजण आयटी व अन्य विषयांत उच्च शिक्षण घेऊन परदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. कारण येथे ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर अन्याय होतो व तेथे त्यांना मान-सन्मान मिळत आहे.
अशा संपन्न समाज बांधवांनी समाजाच्या भल्यासाठी एकत्र यायला हवे आणि समाजातील गरीब, गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार उचलायला हवा. व्यावसायिक, उद्योजकांनी आपल्याच समाज बांधवांना नोकरीत प्राधान्य द्यायला हवे, अशी अपेक्षा पारेकर गुरूजींनी व्यक्त केली.

Web Title: Movement of Dombivali movement for Brahmins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.