वाडा तहसीलकडून वृद्धांची ससेहोलपट
By admin | Published: August 13, 2016 03:51 AM2016-08-13T03:51:47+5:302016-08-13T03:51:47+5:30
तालुक्यातील असंख्य वृद्ध नागरिक, विधवा व निराधार महिला यांना विविध योजनेंंतर्गत मानधन दिले जाते. सध्या संबंधित व्यक्ती हयात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी वृद्ध नागरिकांना
वाडा : तालुक्यातील असंख्य वृद्ध नागरिक, विधवा व निराधार महिला यांना विविध योजनेंंतर्गत मानधन दिले जाते. सध्या संबंधित व्यक्ती हयात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी वृद्ध नागरिकांना थेट तहसील कार्यालयात बोलावले जात असल्याने त्याचा त्रास वृध्द नागरिकांसह विधवा महिलांना होत असल्याने विविध संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील असंख्य नागरिकांना वृद्धापकाळ योजनेंतर्गत सहाशे रु पये मानधन दर महिन्याला दिले जाते. तसेच निराधार व विधवा महिलांनाही याच प्रकारचे मानधन संजय गांधी निराधार योजनेतून दिले जाते. या योजनेतील लाभार्थी आता हयात आहेत की नाही, पाहण्याचे काम सुरू आहे. तसेच त्यांच्या प्रकरणाला आधारकार्ड नंबर जोडण्याचे काम सुरू केले. यासाठी लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीकडून हयात असल्याचा दाखला घेतला जातो. त्याशिवाय ते प्रकरण ग्राह्य धरले जात नाही. असे असतानाही वाडा तहसीलच्या संजय गांधी शाखेकडून लाभार्थ्यांना थेट तहसीलदार कार्यालयात बोलावून घेतले जाते. व तो हयात असल्याबाबत शहानिशा केली जात आहे. गुरुवारी दि.११ रोजी वाडा तालुक्यातील घोडसाखरे येथील वयोवृद्ध नागरिक धर्मा बेंडू दुधवडे यांना त्यांच्या नातेवाईकांनी तहसील कार्यालयात आणले होते. विशेष म्हणजे १०५ वर्षे वय असलेल्या या वयोवृद्धाला नीट चालताही येत नव्हते. (वार्ताहर)
- यासंदर्भात वाड्याचे नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता, यापुढे वयोवृद्धांना तहसीलदार कार्यालयात न बोलवता आमचे तलाठीच गावात जाऊन माहिती घेतील, असे त्यांनी सांगितले.