‘ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास नागरिकांच्याच पैशाची बचत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:14+5:302021-07-12T04:25:14+5:30
कल्याण : शहरातील प्रत्येक सोसायटीने ओला-सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प सोसायटीतच राबविल्यास नागरिकांच्याच पैशाची ...
कल्याण : शहरातील प्रत्येक सोसायटीने ओला-सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प सोसायटीतच राबविल्यास नागरिकांच्याच पैशाची बचत होईल, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
डोंबिवली पूर्वेतील महावीरनगर सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ शनिवारी शिंदे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, पदाधिकारी राजेश कदम, भाजप माजी नगरसेविका सुनीता पाटील, संजय चौधरी आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, ‘ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण ही काळाची गरज आहे. केडीएमसी दीड वर्षापासून शून्य कचरा मोहीम राबवत असून, आतापर्यंत साडेतीन हजार टन ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली आहे. मनपा हद्दीतील जवळपास ५० मोठ्या सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. अनेक सोसायट्यांनी आपल्या आवारातच ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केल्यास मनपावरील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा भार कमी होईल. मनपा ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करते; परंतु त्यावर खर्च होणारा पैसा हा नागरिकांकडून करातून गोळा केलेला असतो. प्रक्रियेवरील मनपाचे पैसे वाचणार म्हणजेच जनतेच्या पैशाची बचत होईल. त्यामुळे सर्व लहान-मोठ्या सोसायट्यांनी ओला-सुका कचरा वर्गीकरणास सहकार्य करून शहर कचरामुक्त करण्याच्या मोहिमेस हातभार लावावा.’
--------------------------