राम कापसे यांचा ‘तो’ औैचित्यभंगच
By Admin | Published: August 28, 2016 03:58 AM2016-08-28T03:58:28+5:302016-08-28T03:58:28+5:30
निवडणुकीच्या राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते. त्यामुळे आबासाहेब पटवारी यांना आमदारकीची उमेदवारी देण्याचे पक्षाच्या जिल्हा समितीने
डोंबिवली : निवडणुकीच्या राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते. त्यामुळे आबासाहेब पटवारी यांना आमदारकीची उमेदवारी देण्याचे पक्षाच्या जिल्हा समितीने मान्य केले असून तशी शिफारस केल्याचे दिवंगत नेते राम कापसे यांनी स्वत: पटवारी यांना का सांगितले, ते अनाकलनीय आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी राम कापसे यांच्याकडून झालेल्या औचित्यभंगावर शनिवारी बोट ठेवले.
कापसे यांनी उमेदवारी पक्की झाल्याचे सांगितल्यामुळे पटवारी यांनी त्यांच्या परिचित व्यक्तींना ही वार्ता दिली. मात्र, जिल्हा ते दिल्लीपर्यंतचा पल्ला गाठेपर्यंत पटवारी यांचे नाव कट झाले. कापसे आता हयात नाहीत. त्यामुळे ते घडलेल्या घटनेचा खुलासा करू शकत नाहीत. मात्र, सकृतदर्शनी तरी पटवारी यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे कापसे यांनी जे काही सांगितले, ते मला अनुचित वाटते, असे नाईक म्हणाले.
सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात आबासाहेब पटवारी यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ या आत्मनिवेदनपर पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. अशोक कुकडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, दिलीप करंबेळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल नाईक यांनी सांगितले की, आबासाहेबांंनी आपल्या पुस्तकात अनेक उल्लेख केले आहेत. ते मी चार तास खर्च करून वाचले. त्यात निवडणुकीचा व उमेदवारीचा उल्लेखही आला आहे. उमेदवारी देणे अथवा नाकारणे, हा सर्वस्वी पक्षाचा अधिकार आहे. तरीदेखील काम करीत राहणाऱ्याचे कधीही नुकसान होत नाही. त्याचा प्रत्यय ‘सहस्रचंद्रदर्शन’ यातून येत आहे. लोकमान्य टिळकांनी जशी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केले, त्याच धर्तीवर पटवारी यांनी नववर्ष स्वागतयात्रा सुरू केली. याकडे नाईक यांनी लक्ष वेधले.
स्रेही असूनही २९व्या क्रमांकावर
मी पटवारी यांचा स्नेही आहे. मात्र, पुस्तकात त्यांनी माझा कुठेही उल्लेख केलेला नाही. ज्यांचा पुस्तकात उल्लेख करणे शक्य नाही, त्याची नामावली पटवारी यांनी शेवटी दिली आहे. त्या नावांतील माझे नाव २९ व्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक व माझे मार्गदर्शन असा त्यांनी उल्लेख केलेला पाहून बरे वाटले, असे बोलून नाईक यांनी पटवारी यांनाही कोपरखळी दिली.