वातानुकूलित बसचे १५ आॅगस्टला लोकार्पण
By admin | Published: August 11, 2016 04:01 AM2016-08-11T04:01:24+5:302016-08-11T04:01:24+5:30
पालिकेच्या परिवहन ताफ्यात दाखल झालेल्या वातानुकूलित बसचा लोकार्पण सोहळा १५ आॅगस्टला होणार आहे.
भाईंदर : पालिकेच्या परिवहन ताफ्यात दाखल झालेल्या वातानुकूलित बसचा लोकार्पण सोहळा १५ आॅगस्टला होणार आहे. उद््घाटनाच्यादिवशी बसमधून प्रवास करणाऱ्यांना एक दिवसाची विनामूल्य सफर घडविण्याचा निर्णय महापौर गीता जैन यांनी घेतला आहे.
पालिकेने २०१० मध्ये खाजगी लोकसहभाग तत्वावर सुरु केलेल्या परिवहन सेवेत वातानुकूलित बसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी केंद्राच्या तत्कालिन जेएनएनआरयूएम योजनेतंर्गत एकूण २५० पैकी ५० बस खरेदी केल्या. या सेवेच्या कंत्राटातंर्गत पालिकेने कंत्राटदारा कंपनीला बस आगारासाठी जागाच उपलब्ध करुन न दिल्याने वातानुकूलित बस खरेदीचा प्रस्ताव मागे पडला. दरम्यान तीन ते चार वर्षातच या सेवेतील बस नादुरुस्त झाल्याने ही सेवा असमाधानकारक ठरु लागली.
प्रशासनाने ही सेवा मोडीत काढत २५ सप्टेंबर २०१५ मध्ये कंत्राटावरील बससेवा सुरु केली. ही सेवा ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्टवर चालविण्याचा निर्णय झाल्याने दुसऱ्या टप्प्यात १०० बस खरेदी केल्या.
सध्या सेवेत ४३ मिडी व स्टॅन्डर्ड बस समाविष्ट केल्या असून त्यातील सुमारे ३६ ते ३८ बसच दररोज प्रवाशांना सेवा देत आहेत. उर्वरित ५७ बसमध्ये १० मिनी, १० वातानुकूलित व ३७ स्टॅन्डर्ड प्रकारच्या बसचा समावेश आहे. दरम्यान १० पैकी ५ वातानुकूलित बस नुकत्याच सेवेत दाखल झाल्या आहेत. या बसची नोंदणी प्रक्रीया अलिकडेच पूर्ण झाल्याने लोकार्पण सोहळा १५ आॅगस्टला होणार आहे. (प्रतिनिधी)