‘त्या’ रहिवाशांना तत्काळ बाहेर काढा
By admin | Published: August 9, 2016 02:21 AM2016-08-09T02:21:00+5:302016-08-09T02:21:00+5:30
भिवंडीत एकामागोमाग एक घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका
कल्याण : भिवंडीत एकामागोमाग एक घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) हद्दीतही अतिधोकादायक इमारतींचा वाढता धोका पाहता या इमारतींमधील रहिवाशांना तत्काळ बाहेर काढा. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन इमारत तोडा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी सोमवारच्या आढावा बैठकीत दिले. या फतव्यामुळे महापालिका प्रशासन आणि रहिवासी यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. गेल्या वर्षी २८ जुलैला रात्री ठाकुर्लीतील ‘मातृकृपा’ ही धोकादायक इमारत कोसळून त्यात ९ जणांचा बळी गेला होता. कल्याण-डोंबिवलीत २९५ इमारती धोकादायक, तर ३५५ इमारती अतिधोकादायक आहेत. बहुतांशी इमारती या ३० ते ४० वर्षांपेक्षा जुन्या आहेत. त्यामुळे त्या मोडकळीस आल्या आहेत. अशा इमारतींना महापालिका दरवर्षी नोटिसा बजावते. जीर्ण अवस्थेतील इमारती तातडीने तोडा, असे आदेशही दिले जातात. परंतु, यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही.
परिणामी, पावसाळ्याच्या धर्तीवर धोकादायक इमारतींची जाहीर केलेली यादी कारवाईअभावी कागदावरच राहते. प्रशासन ठोस अंमलबजावणी करत नसल्याने धोकादायक बांधकामांचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. दुसरीकडे रहिवासीही कारवाईत खंड पडण्यास कारणीभूत ठरतात. जोपर्यंत पुनर्वसन केले जात नाही, तोपर्यंत घरे रिकामी न करण्याचा घेतलेला पवित्रा, मालक-भाडेकरू वाद आदी मुद्देही कारवाईत अडथळा आणण्यास कारणीभूत ठरतात. (प्रतिनिधी)