रस्ता ? नव्हे ! अपघातांचा महामार्ग
By admin | Published: August 12, 2016 01:22 AM2016-08-12T01:22:32+5:302016-08-12T01:22:32+5:30
डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था झाली असताना लोकप्रतिनिधींना जाग आलेली नाही
डहाणू/बोर्डी : डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था झाली असताना लोकप्रतिनिधींना जाग आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना हा रस्ता नव्हे, तर अपघातचा मार्ग वाटू लागला आहे. बोर्डी सागरी पर्यटन स्थळ आणि शिक्षणाची पंढरी असल्याने वर्षभर पर्यटक आणि परगावतील विद्यार्थ्यांचा राबता असतो. रोज घोलवडसह परिसरातील गावातून शेतमाल, बागायती फळे आणि झाई येथून मच्छी सर्वत्र पाठविली जात असल्याने स्थानिकांसाठी हा रास्ता लाईफलाईन आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या प्रमुख राज्य मार्गाची देखभाल दुरूस्ती न केल्याने रस्त्यांवर एक ते दीड फुट खोलीचे खड्डे आणि ठीक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. गुजरात राज्यातील पारडी, तसेच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील चारोटी, दापचरी चेक नाका येथील टोल चुकविण्यासाठी अवजड वाहने याच मार्गाचा वापर करतात. शिवाय उंबरगाव येथील जीआयडीसीतील अनेक कारखान्यातील मजूरवर्गांची ने-आण करणाऱ्या बसेस क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करतात. त्यापैकी अनेक बसेस कालमर्यादा ओलांडलेल्या असल्याने रस्त्यांची दुरावस्थेसह काळा धूर ओकत असल्याने पर्यावरणाला हानी पोहचवत आहेत. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे रस्ते खड्डेमय झाले आहेत. बोर्डी आणि झाई गावातील रस्त्यालगत भर पावसातही सुरू असलेले खोदकामही कारणीभूत आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकप्रतिनिधींना सोयरसुतक नाही.मागील पाच वर्षांपासून डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गासाठी निधी मंजूर नाही. (वार्ताहर)