“भीती दाखवून खिसे कापा व राज्य करा असले राजकारण देशात सुरु”: सुषमा अंधारे 

By धीरज परब | Published: October 15, 2022 07:20 PM2022-10-15T19:20:47+5:302022-10-15T19:22:54+5:30

सिंधुदुर्ग-रत्नागिरी गोव्याला आणि मुंबई गुजरातला जोडली तर आश्चर्य वाटायला नको इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली.

shiv sena sushma andhare criticised bjp and eknath shinde group in maha prabodhan yatra at mira road | “भीती दाखवून खिसे कापा व राज्य करा असले राजकारण देशात सुरु”: सुषमा अंधारे 

“भीती दाखवून खिसे कापा व राज्य करा असले राजकारण देशात सुरु”: सुषमा अंधारे 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाजपाने राज्य करण्यासाठी लोकांची सहनशक्ती वाढवली व त्यांना संमोहित केले . त्यांनी एवढी महागाई वाढवली , जनतेचा खिसा कापला तरी लोकांनी बोलायचे नाही, केवळ नमो नमो म्हणायचे. लोक बोलले तर त्यांना देशभक्त नाहीत का ? हिंदू नाही का ? असे म्हणत देशद्रोही ठरवण्याची भीती दाखवून जनतेचे तोंड दाबून ठेवल्याची टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मीरारोड येथील महाप्रबोधन यात्रे वेळी केली . हिंदू म्हणायचे म्हणजे जनतेच्या बऱ्याच प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी हे मोकळे असा आरोप भाजपा, शिंदे गट आदींवर केला . 

मीरारोडच्या शिवार उद्यान येथे शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेची सभा झाली . यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते . शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व खासदार राजन विचारे , संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर , ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे सह सेनेचे पदाधिकारी , माजी नगरसेवक आदी उपस्थित होते . 

अंधारे म्हणाल्या की , हिंदूंचे आदर्श प्रभू श्रीरामाचे भाऊ लक्ष्मण यांनी वहिनी साठी जीवाची बाजी लावली .  मात्र शिवसैनिक भाऊ दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीच्या मार्गात अडथळे आणणारे हे बेगडी हिंदुत्ववादी आहेत . त्यांना सत्ता दिसल्याने फडणवीस यांच्या सोबत हम दिल दे चुके सनम आणि सत्ता जायला लागली म्हणून शिवसैनिकांसोबत हम आपके है कोन असे चालवले आहे . फडणवीस स्क्रिप्ट लिहून देणारे लेखक व शिंदे वाचक असल्याची टीका त्यांनी केली . 

हे लोक महिलांचा आदर सन्मान करा म्हणतात पण राज्याला महिला बालकल्याण मंत्री नाही , एकही महिला मंत्रिमंडळात नाही . उद्या सिंधुदुर्ग - रत्नागिरी गोव्याला जोडली आणि मुंबई गुजरातला जोडली तर आश्चर्य वाटायला नको इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे . स्वतःच्या स्वार्था साठी त्यांनी शिवसेनेला मतदान करणाऱ्या जनतेचा विश्वासघात केला अश्या गद्दारांना गाडून शिवसेना पुन्हा उभी राहील असे अंधारे म्हणाल्या . 

शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले की , ज्या मोदींना बाळासाहेबांनी व शिवसेनेने वाचवले त्याच मोदी - शहा यांनी शिवसेना संपण्यासाठी २०१४ सालंच्या निवडणुकीत २७ सभा घेतल्या . उद्धव ठाकरे एकटेव शिवसैनिक होते तेव्हा ठाण्यातले दाढीवले कुठे होते ? ठाण्याच्या बाहेर पडले तरी का ?. २०१९ सालच्या निवडणुकीत युती केली पण सेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भाजपाने माणसे उभी केली . रमेश लटकेंना पाडण्यासाठी त्यावेळी उभ्या केलेल्या मुरजी पटेल यांना अंधेरी पोटनिवडणुकीत यावेळी भाजपाने उमेदवारी दिली आहे .  दिवंगत शिवसैनिक लटकेंच्या पत्नी यांना खोटे बनाव करून छळले जात आहे . प्रशासन गुलामा सारखे राबवले जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला . 

भाषणात अंधारे , सावंत , विचारे आदींनी भाजपा सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटातील काही आमदारांवर टीकेची झोड तसेच खोचक टोले लगावले . स्थानिक पोलिसां कडून सभेतील नेत्यांच्या भाषणावर बारीक लक्ष ठेवले जात होते . छायाचित्रण सह भाषणातील वक्तव्ये याची नोंद केली जात होती . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena sushma andhare criticised bjp and eknath shinde group in maha prabodhan yatra at mira road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.