शास्त्रीनगरात तबेल्यांची दुर्गंधी; आरोग्य धोक्यात
By admin | Published: August 18, 2015 11:25 PM2015-08-18T23:25:29+5:302015-08-18T23:25:29+5:30
कल्याण (पूर्व) च्या प्रभाग क्र. ५८, शास्त्रीनगरमधील तबेले मालकांनी गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील नागरिकांना वेठीला धरले असून गाई, म्हशींच्या
दिवाकर गोळपकर,कोळसेवाडी
कल्याण (पूर्व) च्या प्रभाग क्र. ५८, शास्त्रीनगरमधील तबेले मालकांनी गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील नागरिकांना वेठीला धरले असून गाई, म्हशींच्या वाहत्या शेणमूत्रामुळे गटारे, नाले तुंबतात. शिवाय दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून डास-मच्छरांच्या प्रभावामुळे जिणे कठीण झाले आहे. मनपाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कारवाई केली नाही, त्यामुळे तबेले मालक मुजोर झाले आहेत.
सीताबाई चाळ, शास्त्रीनगर परिसरारत एकूण ६ तबेले आहेत. त्यापैकी २ तबेले मालकांनी शेणासाठी टाक्या बसवल्या असून साठवलेले शेण ते विकत असतात. स्वच्छता पाळतात, उरलेले तबेले मालक मात्र कोणतीही स्वच्छता पाळत नाहीत. दिवसभर गार्इंना चरायला सोडले जाते. त्या सर्वत्र घाणेरडे वातावरण तयार करतात.
प्रभागात चाळी ६५ टक्के व इमारती ३५ टक्के आहेत. गोपाळकृष्णनगर, सूचक गाव, साईधामनगर, लोकसेवानगर, शास्त्रीनगर टेकडी, अष्टविनायक सोसायटी, आदर्शनगर, रचना पार्क, विशाल कॉम्प्लेक्स, बुद्ध विहार परिसर असून त्याची अंदाजे १५,५०० लोकसंख्या आहे.
प्रत्येक मोठ्या सोसायटीमध्ये कूपनलिका आहे. तर खाजगी दोन विहिरींपैकी १ बुजलेली आहे. २५ ते ३० वर्षांपासून या प्रभागात पाण्याचे दुर्भीक्ष होते. दूषित पाण्याचा त्रास होता. अतिशय कमी दाबाने पाणी होते. बुद्धविहार परिसरात पाणीटंचाई तीव्र होती. चेतना नाक्यावरून महिला हंड्याने पाणी भरत होत्या. टंचाईग्रस्त भागातील जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलून नव्या जलवाहिन्या टाकल्या. आता पाणीपुरवठा समाधानकारक असल्याचा दावा नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केला. प्रभागात सुलभ शौचालये ५ आहेत. अनेक ठिकाणी शौचालयांची दुरूस्ती व पुनर्बांधणी करण्यात आली. सेफ्टी टँक नसलेल्या चाळी अनेक आहेत. परंतु रचना पार्कसारख्या मोठ्या सोसायटीने सेफ्टी टँक बुजवून सांडपाणी नाल्यात सोडल्याबद्दल प्रशासनाला कळवूनही कारवाई झालेली नाही. मग नगरसेवक करतात काय? हा प्रश्न आहे.