स्वा. सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:50 AM2019-05-30T00:50:20+5:302019-05-30T00:50:24+5:30
‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने नेल्सन मंडेला यांना सन्मानित केले;
डोंबिवली :‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने नेल्सन मंडेला यांना सन्मानित केले; मात्र देशासाठी, मातृभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना मात्र सन्मानापासून वंचित ठेवण्यात आले. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या मोदी सरकारने सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करावे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यासाठी पाठपुरावा करावा. डोंबिवलीकरांसह असंख्य सावरकरप्रेमींची ती इच्छा आहे, असे मत पुण्याचे प्रख्यात व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी व्यक्त केले.
सावरकरांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त राज्यमंत्री चव्हाण यांनी येथील सावरकर उद्यानामध्ये मंगळवारी व्याख्यान आणि सावरकर जीवनपट या विषयावर चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यावेळी बावस्कर बोलत होते. युवकांनी जास्तीतजास्त सावरकर साहित्याचे वाचन करावे. मातृभूमी प्रेम, भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सावरकरांचे तसेच त्यांचे वडील बंधू, धाकटे बंधू आणि पूर्ण कुटुंबीयांनी दिलेली आहुती यासंदर्भात त्यांनी उपस्थितांना सांगितले. मातृभूमीला स्वातंत्र्य मिळावे आणि पुढील पिढीला गुलामगिरीमुक्त करण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा, असंख्य वेदना सहन केल्याचे ते म्हणाले.
अंदमान येथील स्वा. सावरकरांच्या ओळी काढून टाकण्यात आल्या आहेत. तेव्हापासून चव्हाण यांनी सावरकर उद्यानात त्या ओळी पुन्हा लागत नाहीत, तोपर्यंत अखंड ज्योत अखंड तेवत ठेवली आहे. आता पुन्हा मोदी सरकार आले आहे, ही ज्योत अखंड तेवत ठेवावी लागणार नाही, याची जबाबदारी चव्हाण हे घेतील आणि त्यासाठी येथील नागरिकांनीही पाठपुरावा करावा, असे आवाहन बावस्कर यांनी केले. त्यावर राज्यमंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.
यानिमित्ताने भरवण्यात आलेल्या सावरकर जीवनपट चित्रप्रदर्शनाला असंख्य डोंबिवलीकरांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यावेळी भाजपचे नगरसेवक संदीप पुराणिक, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, सुरेश पुराणिक, संजीव बीडवाडकर, प्रभू कापसे आदींसह असंख्य सावरकरप्रेमी आवर्जून उपस्थित
होते.