बाळकुम-गायमुख सागरी मार्गाचा खर्च ६०० कोटींनी वाढणार; एमएमआरडीए- ठाणे-महापालिकेला झटका

By नारायण जाधव | Published: October 11, 2023 04:45 PM2023-10-11T16:45:30+5:302023-10-11T16:46:32+5:30

पर्यावरण मंत्रालयाने घेतली हरकत

The cost of Balkum-Gaymukh sea route will increase by 600 crores; A blow to MMRDA- Thane-Municipality | बाळकुम-गायमुख सागरी मार्गाचा खर्च ६०० कोटींनी वाढणार; एमएमआरडीए- ठाणे-महापालिकेला झटका

बाळकुम-गायमुख सागरी मार्गाचा खर्च ६०० कोटींनी वाढणार; एमएमआरडीए- ठाणे-महापालिकेला झटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ठाणे शहराच्या रस्ते वाहतुकीवर ताण कमी करून वाहनाच्या प्रदूषणापासून ठाणेकरांची सुटका करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या बाळकुम-गायमुख या सहा पदरी मार्गास मंजुरी देताना केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने एमएमआरडीएसह ठाणे महापालिकेस मोठा झटका दिला आहे.

१३.२१५ किमीच्या मार्गात आधीच्या आराखड्यानुसार मार्गातील नौदलाच्या प्रभाव क्षेत्रात कट ॲन्ड कव्हर तत्त्वावर रस्ता बांधण्याचे प्रस्तावित होते. मात्र, आता केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या एक्सपर्ट ॲप्राजल समितीने २६ सप्टेंबर २०२३ च्या बैठकीत त्यास हरकत घेऊन हा संपूर्ण ८०० मीटर लांबीचा एक तर उन्नत वा भुयारी करण्याची सूचना केली आहे. परंतु, उन्नत मार्गास आधीच नौदलाची हरकत असल्यामुळे तो आता भुयारीच बांधावा लागणार आहे. यामुळे आधीच्या प्रस्तावानुसार ९०० कोटींवरून त्याचा खर्च १५०० कोटींवर जाऊन अंदाजे ६०० कोटी रुपये वाढणार आहे.

ठाण्यातील बाळकुम ते गायमुख हा रस्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेसह एमएमआरडीएने कंबर कसली आहे. त्यानुसार एमएमआरडीएने आपल्या २०२१ मध्ये झालेल्या १५१ व्या बैठकीत या प्रकल्पासाठी १३१६.१८ कोटी रुपये इतका खर्च गृहीत धरला होता. मात्र, नंतर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने आराखडा सादर केल्यानंतर खर्चात थेट दुपटीने वाढ झाली आहे. त्यानुसार या ठाणे खाडी किनारा रस्त्यासाठी २६७४ कोटी रुपये इतका निधी लागणार असून, त्यास एमएमआरडीएने १५४ व्या बैठकीत मंजुरी दिली आहे. परंतु, आता त्यात आता पुन्हा ६०० कोटींची वाढ होणार असल्याने पुन्हा त्यासाठी मंजुरी घ्यावी लागणार आहे.

या गावांची जमीन जाणार
खारेगाव येथून सुरू होऊन घोडबंदर रस्त्यावरील गायमुख येथे हा रस्ता सागरी रस्ता संपणार आहे. त्यात बाळकुम, कोलशेत, वाघबीळ, ओवळा, कासारवडवली, मोघरपाडा या गावांतून तो जाणार आहे. मूळ प्रस्तावात नौदलाने त्यांच्या प्रभाव क्षेत्रात तो खोदकाम करून भुयारी करून तो नंतर कव्हर करण्याची सूचना करून आपले ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. परंतु, खाेदकाम करून पुन्हा कव्हर करण्यात मोठ्या प्रमाणात खारफुटीसह सीआरझेड क्षेत्र प्रभावीत होणार असल्याने केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने तो उन्नत किंवा भुयारी बांधण्याची सूचना केली आहे.

यामुळे वाढणार खर्च
ठाणे महापालिकेच्या आधीच्या प्रस्तावात नौदलाच्या प्रभाव क्षेत्रात तो जमिनीखाली कट ॲन्ड कव्हर तत्त्वावर बांधण्याचे प्रस्तावित होते. यानुसार जमिनीखाली १० मीटर खोलीचे खोदकाम करून नंतर ते कव्हर करण्यात येणार होते. त्यासाठी ९०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु, तो भुयारी केल्यास जमिनीखाली ३० मीटर खोलीचे खोदकाम करावे लागणार आहे. यामुळे खर्च ९०० कोटींवरून १५०० कोटींवर जाणार आहे.

८४४१ खारफुटी झाडांना फटका
बाळकुम- गायमुख सागरी मार्गात १००३७७ चौरस मीटर खारफुटीचे क्षेत्र प्रभावीत होणार आहे. यात खारफुटीची ७०३४ झाडे तात्पुरती तर बाळकुम येथे ४३९, खारेगाव ७७, कोलशेत ५६२, कावेसर ३४, वडवली-९ आणि भाईंदरपाडा १०४ अशी १४०७ खारफुटीची झाडे कायमची तोडावी लागणार आहेत.

Web Title: The cost of Balkum-Gaymukh sea route will increase by 600 crores; A blow to MMRDA- Thane-Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.