बाजार समितीत शेतमालाला उठाव नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:14+5:302021-04-04T04:42:14+5:30
कल्याण : लॉकडाऊन होईल या भीतीने तयार असलेला शेतमाल शेतकऱ्यांनी शनिवारी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) विक्रीसाठी पाठवला ...
कल्याण : लॉकडाऊन होईल या भीतीने तयार असलेला शेतमाल शेतकऱ्यांनी शनिवारी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) विक्रीसाठी पाठवला होता. मात्र, आवक चांगली होऊनही शेतमालाला शनिवारी उठाव नव्हता. जवळपास २५ गाड्या शेतमाल पडून होता. त्यामुळे किमान २५ लाख रुपयांचे नुकसान व्यापारी आणि शेतकरी वर्गाला सोसावे लागले आहे.
कल्याण एपीएमसी ही नवी मुंबईनंतरची दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती आहे. तेथे कोरोनापूर्वी शेतमालाच्या जवळपास २२५ गाड्या दररोज येत होत्या. मात्र, कोरोनामुळे त्याला ब्रेक लागला होता. आताच कुठे एपीएमसीतील व्यापार पूर्ववत होत असताना कोरोनाचे रुग्ण वाढल्याने केडीएमसीने सर्व आस्थापनांना विविध निर्बंध लावले. कोरोनाने उच्चांक गाठला होता तेव्हाही बाजार समितीला सूट दिली होती. आता पुन्हा बाजार समिती ५० टक्के क्षमतेने सम-विषम तारखांनुसार सुरू ठेवण्याचे आदेश काढले.
लॉकडाऊनच्या भीतीपोटी एपीएमसीत शनिवारी शेतमाल खरेदीसाठी गर्दी होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मालाची १२५ गाड्यांची आवक झाली आहे. आवक ५० टक्के क्षमतेनुसार चांगली झाली. मात्र, मालाला उठाव नव्हता. सध्या कोरोनामुळे बाजारात ग्राहक फिरकत नाहीत. सायंकाळी ६ वाजता सर्व काही बंद होत असल्याने ग्राहक येत नाहीत. बाजार समितीचा व्यापार हा पहाटे २ ते दुपारी १२ दरम्यानच्या वेळेत होतो. त्यानंतर ग्राहक एपीएमसीत फिरकत नाहीत. २५ गाड्या माल पडून होता. त्यामुळे व्यापारी व शेतकऱ्यांचे जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती बाजार समितीचे संचालक सदस्य व व्यापारी बाबाजी पोखरकर यांनी दिली आहे.
नाशीवंत माल फेकून देण्याची वेळ
- एपीएमसीचे संचालक सदस्य व व्यापारी संघटनेचे मोहन नाईक म्हणाले, शनिवारी माल पडून होता. तसेच कोरोनामुळे रविवारी एपीएमसीचा व्यापार पूर्णपणे बंद ठेवण्यात येताे. रविवारी व्यापार सुरू ठेवण्याची व्यापाऱ्यांची मागणी बाजार समिती संचालक मंडळाने मान्य करून तसा ठरावही केला. मात्र, पोलीस या ठरावाला जुमानत नसल्याने बाजार बंद असतो.
- दुसरीकडे रविवारी एपीएमसी बंद असल्याने शनिवारी उरलेला माल फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर येणार आहे. त्यात पालेभाज्या, कोथिंबीर व अन्य नाशीवंत भाजीपाला आहे. त्यात सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्याने एपीएमसीचे कर्मचारी शनिवारी कामावर नसतात. त्यामुळे शनिवारी प्रशासकीय कामकाजात अडथळे येतात.
---------------