ठाण्यात १४ मेपर्यंत आंदोलनासह जमावासाठी बंदी आदेश राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 12:14 AM2021-04-30T00:14:35+5:302021-04-30T00:16:20+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३० एप्रिल ते १४ मे पर्यंत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरु ध्द कलम 135 प्रमाणे कारवाई केली जाणार आहे.

There will be a curfew in Thane till May 14 | ठाण्यात १४ मेपर्यंत आंदोलनासह जमावासाठी बंदी आदेश राहणार

पोलीस आयुक्तांनी काढले आदेश

Next
ठळक मुद्दे पोलीस आयुक्तांनी काढले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३० एप्रिल ते १४ मे पर्यंत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. या काळात पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगणे आणि साठा करणे तसेच कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला बंदी घालण्यात आल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे.
आपल्या मनाई आदेशामध्ये पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे की, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा आणि उपोषणे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तशी काही आंदोलनेही सुरु आहेत. येत्या १० मे रोजी रोजी शब-ए-कदर त्यापाठोपाठ १३ मे रोजी परंपरेने येणारी शिवजयंती तसेच १४ मे रोजी रमजान ईद त्याचबरोबर अक्षय्य तृतीया आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असे सण आणिस उत्सव पार पडणार आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) आणि ( ३) अन्वये जिवित तसेच वित्त सुरक्षित राहण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा मनाई आदेश लागू केल्याचे यामध्ये म्हटले आहे.
* असा आहे आदेश-
तलवारी, भाले, दंड, बंदुका आणि लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. तसेच क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे, साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. ) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे आदींना मनाई राहणार आहे. कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा नेत्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन आणि दहन करणे. किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन अस्थिर होईल, अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे, पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे आणि घोषणा प्रति घोषणा देणे आदी कृत्यांना मनाई केली आहे.
यांना मनाई आदेश लागू नाही-
सरकारी नोकर, लग्न कार्यासाठी जमलेले लोक, अंत्यसंस्कारासाठी काढलेली मिरवणूक, न्यायालयीन कामकाज, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त आणि त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका आदीेंना हा मनाई आदेश लागू राहणार नाही. हा आदेश आधी ३० एप्रिलपर्यंत लागू केलेला होता. गुरुवारी यामध्ये सुधारणा करुन तो ३० एप्रिल ते १४ मे २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात वाढविण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरु ध्द कलम 135 प्रमाणे कारवाई केली जाणार आहे.

Web Title: There will be a curfew in Thane till May 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.