आदिवासींना करटोलींचा आधार
By Admin | Published: August 17, 2016 02:24 AM2016-08-17T02:24:22+5:302016-08-17T02:24:22+5:30
आयुर्वेदिक महत्त्व आणि खायला चविष्ट असणाऱ्या करटोलींना भिवंडी ग्रामीण भागासह शहरात मोठी मागणी आहे. ही भाजी किलोला २५० रुपये दराने विकली जात आहे.
अनगाव : आयुर्वेदिक महत्त्व आणि खायला चविष्ट असणाऱ्या करटोलींना भिवंडी ग्रामीण भागासह शहरात मोठी मागणी आहे. ही भाजी किलोला २५० रुपये दराने विकली जात आहे.
रानभाज्यांना आयुर्वेदिक महत्त्व असल्याने याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. सध्या आवक कमी असल्याने या भाजीचे दर वाढले असले तरी ग्राहकांची इतर भाज्यांपेक्षा करटोलींना अधिक पसंती आहे. तालुक्यातील अंबाडी, पडघा, खारबाव, अनगाव, दाभाडसह वंजारपट्टीनाका, मंडई, धामणकरनाका येथे, तर मुंबई-नाशिक महामार्गावर खडवली-वांद्रे, डोहळे, कोशिंबी या ठिकाणी करटोलींची विक्री होते. ग्राहक रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या आदिवासी महिलांकडून या रानभाज्या विकत घेतात. करटोली पावसाळ्यात येत असली तरी श्रावणात तिची मागणी वाढते. त्यामुळे आदिवासींना रोजगार मिळतो. भरपावसात करटोली शोधण्यासाठी अनेकदा आदिवासींना रानात जावे लागते. बाहेरून हिरवीगार दिसणारी काटेरी असलेली भाजी आदिवासी कुटुंबांचा पावसाच्या काळात आधार बनते. कल्याण, ठाणे, नवी मुंबई येथील व्यापारी येऊन ही करटोली खरेदी करतात.